
Beed News : आजच्या पिढीने दुष्काळ पहिला, तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे ९३ वर्षे सुरू आहे. या परंपरेच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे शनिवारी (ता. १९) श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ९३ व्या नारळी सप्ताहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. याप्रसंगी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आमदार सुरेश धस, आमदार नमिता मुंदडा, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी अविनाश पाठक उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, की मराठवाडा व बीड जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने कृष्णेचे पाणी आष्टीपर्यंत आणले. ते पाणी संपूर्ण बीड जिल्ह्यात पोहोचविण्याचा आपला प्रण आहे. मराठवाडा व बीड जिल्ह्याला पाणीदार करण्यासाठी ५३ टीएमसी पाणी गोदाखोऱ्यात आणण्याच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील दुष्काळ कायमचा मिटेल.
गहिनीनाथ गडाच्या विकासाचे काम सुरू आहे. पुढे विकासाची आणखी कामे करायची आहेत. संतांनी दाखविलेला भक्तीचा मार्ग समाजाने सोडलेला नाही. समाज घडविणाऱ्या या परंपरेत समाजातील सर्व घटकांचा सहभाग दिसून येतो. यामध्ये मुस्लिम समाज बांधव देखील सहभागी झाले, याचा आनंद आहे.
आमचे नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्याशी वेगळे नाते निर्माण झाले आहे. मला वामनभाऊंच्या या सप्ताहाच्या परंपरेत सहभागी होऊन आशीर्वाद घेता आला याचा मनस्वी आनंद आहे. गहिनीनाथ गडावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताची उत्तम व्यवस्था झाली पाहिजे. गडासमवेतच या परिसरातील भाविकांच्या सोईसुविधांचा तसेच या परिसराचा देखील विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या वेळी गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांनी संत वामनभाऊ यांनी ९३ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या अखंड नारळी सप्ताह परंपरेबाबत माहिती दिली. या वेळी बीड, अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आध्यात्मिक गोडी निर्माण करणारी सप्ताहाची परंपरा : मुंडे
संत वामनभाऊ, संत भगवान बाबा यांनी या भागातील लोकांना आध्यात्मिक गोडी निर्माण करणारी सप्ताहाची परंपरा सुरू केली, ती अखंडपणे सुरू असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. त्या म्हणाल्या, की गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्यासमवेत आहेत. त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुजलाम् सुफलाम् होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.