
Parhani News : सिंचन, कृषी, उद्योग, शिक्षण आदींसह सर्वच क्षेत्रांतील विकासाचा अनुशेष ७५ वर्षांनंतरही कायम असल्याने मराठवाडा मागास राहिला आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी लोक आणि लोकप्रतिनिधींची जनजागृती करावी लागेल.
सिंचनासह सर्वच क्षेत्रातील विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी सरकारवर जनतेचा दबाब वाढवावा लागेल. असे प्रतिपादन मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मंगळवारी (ता. १७) इंडियन मेडिकल असोशिएशन, परभणी अॅस्ट्रॉलॉजिकल सोसायटी, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या परभणी शाखेतर्फे अमृत महोत्सवी मराठवाडा ः अपेक्षा आणि वास्तव या विषयावरील चर्चसत्रात डॉ. काब्दे बोलते होते. अध्यक्षस्थानी डॉ. राजगोपाल कालाणी होते.
अभ्यासगट प्रमुख अर्थशास्त्रज्ञ डॉ. कैलास पाटील, अॅड. अशोक सोनी, डॉ. दत्तात्रय मगर, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. अशोक सिद्देवाड आदी उपस्थित होते. डॉ. काब्दे म्हणाले, की निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन महाराष्ट्र राज्यात सामील झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, की मराठवाडा मागास असल्यामुळे निधीच्या बाबतीत झुकते माप दिले जाईल.
प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी स्थापन दांडेकर, केळकर समितीनी मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासाठी केलेल्या शिफारशीकडे राज्य सरकारांनी दुर्लक्ष केले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रेरणेतून मराठवाडा जनता विकास परिषदेने मराठावाड्यातील शेती, सिंचन, रेल्वेप्रश्नी जनआंदोलने केली. सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. समन्यायी पाणीवाटप तत्त्वाची अंमलबजावणी केली, तर जायकवाडी धरणातून मराठवाड्यात सिंचनासाठी पाणी मिळू शकेल. कृष्णा गोदावरी खोऱ्यातून अपेक्षित पाणी मिळत नाही.
पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविले पाहिजे. जायकवाडी कालव्याच्या दुरुस्ती न केल्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याच्या बाबतीत मराठवाड्याची उपेक्षा केली जात आहे. डॉ. पाटील म्हणाले, की नागपूर कराराचे पालन केले जात नाही. मराठवाडा पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. खरा प्रश्न सिंचनाचा आहे. सिंचन क्षेत्राची स्थिती अत्यंत वाईट आहे.
नाशिक, नगर जिल्ह्यातून हक्काचे पाणी मिळत नाही. मराठवाड्यातील ७६ पैकी ५३ तालुके अवर्षणप्रवण आहेत. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रीतील आमदार, खासदारांच्या जडणघडणीत मोठा फरक आहे. नेतृत्वात सचोटी, निर्गवीपणा हवा. मराठवाड्यात ७५ वर्षांत राजकीय दबाबगट दिसून न आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व कायम आहे. मराठवाड्याच्या विकासचा निधी पश्चिम महाराष्ट्रात पळविला जातो. डॉ.नाईक यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजयकिरण नरवाडे यांनी सूत्रसंचालन केले, तर अनुप शुक्ला यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.