Obituaries Story : एका गावात मुकुंद, हरी व अनंता असे तीन खातेदार होते. त्यांच्या जमिनी गावात असल्या तरी मुकुंद आणि हरी हे अनुक्रमे मुंबईला आणि औरंगाबादला कंपनीत कामाला होते. थोरला मुकुंद शेती करीत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तिन्ही भावांनी आपापल्या जमिनीचे वाटप करून घेतले होते.
थोरला मुकुंद स्वतः शेती करीत होता व धाकट्या दोघांनी गावातील जमीन थोरल्याला कसायला दिली होती. त्यांची आई शेवंता ही थोरल्या मुलाकडे राहत होती. तसेच ती ८-१५ दिवस हवापालट म्हणून दोन्ही मुलांकडे सणावाराला जाऊन राहत असे.
काही वर्षे उलटल्यावर आई शेवंता ही म्हातारी झाली आता ती शक्यतो गावाच्या बाहेर जात नसे. तिच्या ७६ व्या वर्षी ‘आता आईचे वय फार झाले आहे, ती परत माझ्याकडे कधी येईल?’ असे सांगून मधला हरी दिवाळीच्या वेळेस १५ दिवसांसाठी आईला घेऊन मुंबईला गेला.
आईसुद्धा मुलाकडे राहायला गेली आणि काही दिवसानंतर पुन्हा गावी परतली. पुढल्या वर्षी धाकटा मुलगा अनंताने दिवाळीच्या वेळेस आईला औरंगाबादला नेले व त्याच्याकडे आई काही दिवस राहून आली.
त्यानंतर मात्र ४-५ वर्षे ती गावाच्या बाहेर कधीही पडली नाही. वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने तिचा गावात मृत्यू झाला. त्यावेळेस अर्थातच ती थोरल्या मुकुंदाकडे होती. अंत्यविधीला दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबातील मुलीबाळी हे सर्व हजर राहिले आणि त्यांनी रजा काढल्यामुळे १५ दिवस ते गावातच राहिले. शेवतांचा दहावा दिवस व तेरावा दिवस सर्वांनी मिळून केला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र मुकुंदाने आई शेवतांच्या नावावर असलेल्या चार एकर जमिनीच्या तुकड्याची गोष्ट केली. तो म्हणाला, ‘‘एवढी वर्ष आई माझ्याकडे राहिल्यामुळे आईने राजीखुशीने या चार एकर जमिनीचे मला मृत्युपत्र करून दिले आहे व माझ्या एकट्याचे नाव सातबाराला लावावे असा अर्ज मी गाव तलाठ्याकडे देणार आहे.’’ त्यावर हरी आणि अनंता या दोन्ही भावांनी अतिशय आश्चर्य व्यक्त केले.
आम्हाला न सांगता असे कसे तू गुपचूप मृत्युपत्र करून घेतले. आता तर मला आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या समान वाटण्या करून तिसऱ्या हिश्शाप्रमाणे जमीन पाहिजे असे हरीने सांगितले.
एवढेच नाही तर हरीच्या बायकोने आई शेवतांने हरीच्या नावाने केलेले एक मृत्युपत्र इतरांना दाखवून तुमच्याकडे जसे मृत्युपत्र आहे तसे माझ्याकडेही या चार एकर जमिनीचे मृत्युपत्र आहे. शिवाय तुमचे मृत्युपत्र आईच्या वयाच्या ७६ व्या वर्षी केले आहे आणि ते वकिलाला दाखविले असता आमचे मृत्युपत्र १९७८ सालचे म्हणजे नंतरच्या तारखेचे असल्यामुळे अर्थातच कोर्टाला ग्राह्य धरावे लागेल असे वकिली भाषेतील वक्तव्य केले.
एवढे ऐकल्यावर मुकुंदा आणि अनंता यांनी मोठमोठ्याने बोलून हरीला खोट्यात पाडले. तिघांचीही बाचाबाची सुरू असताना अनंताच्या बायकोने पण या भांडणामध्ये उडी मारली आणि आईंनी माझ्या नवऱ्याच्या नावाचे पण मृत्युपत्र केले आहे व ते वयाच्या ८०व्या वर्षी म्हणजेच सर्वांत शेवटी केले आहे असे सांगितले.
मागच्या दिवाळीला जेव्हा आम्ही त्यांना घेऊन गेलो त्यावेळी सब रजिस्ट्रार कार्यालयात हे मृत्युपत्र नोंदविले आहे. तुमची दोन्ही मृत्युपत्रे ही रजिस्टर नसलेली व कोऱ्या कागदावर आहेत पण आमचे मृत्युपत्र मात्र स्टॅम्प पेपरवर आणि नोंदवलेले असल्यामुळे कोर्ट आमचेच मृत्युपत्र ग्राह्य धरेल असा वकिली युक्तिवाद केला.
भावकीसमोर आता तीन मुलांच्याकडे असलेली एकाच आईची तीन मृत्युपत्रे आली होती. कोणत्याच मुलाला नाखूष न करण्याच्या व मुले सांगतील त्या कागदावर सही करण्याच्या आईच्या स्वभावाचा फायदा तीनही मुलांनी घेतला होता.
पुढची तब्बल आठ वर्षे ५० हजार एकराच्या जमिनीसाठी तीनही भावांनी आपापल्या वकिलांवर प्रत्येकी दोन लाख रुपये खर्च केले आणि तब्बल सहा वर्षांनंतर तडजोड करून प्रत्येकाचा एक तृतीयांश हिस्सा मान्य केला. प्रत्येकी दोन लाख खर्च झाल्यानंतरच सर्व भावांना ही अक्कल आली होती.
भावकीतील कितीतरी लोकांनी समजून सांगून सुद्धा हे तिन्ही भाऊ ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. जेव्हा दोन लाख खर्च करून सुद्धा प्रत्येक तारखेला खर्चाचे मीटर पडू लागले तेव्हा कुठे ते जमिनीवर आले होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.