Kolhapur News : मंत्री समितीने यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचेही ठरले आहे. कर्नाटकनेही याचवेळी हंगाम सुरू करण्याचे निश्चित केल्याने यंदा उसाची पळवापळवी होणार नाही असा अंदाज आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील अनेक कारखाने कर्नाटक सीमाभागातील उसाची तोड करतात. कर्नाटकातील कारखानेही पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आणतात. उसाचे आंदोलन सुरू झाले की दोन्ही राज्यांच्या कारखान्यांवर याचा परिणाम होतो. प्रत्येकवर्षी कर्नाटकचा हंगाम लवकर सुरू होतो. याच दरम्यान जर महाराष्ट्रात शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आणि राज्यातील कारखान्यांच्या तोडी बंद पाडल्या की कर्नाटकचे कारखाने महाराष्ट्रातील ऊस तोडायला सुरुवात करतात.
सीमेवरच्या गावांचा बहुतांशी ऊस दोन्ही राज्यातील कारखान्यामध्ये विभागला जातो. यंदा मात्र संघटनेच्या आंदोलनाचा अडथळा आला नाही तर दोन्ही राज्यांच्या तोडी एकदम सुरू होतील यामुळे पळवापळवीवर निर्बंध येतील अशी शक्यता आहे. गेल्यावर्षी उसाचे गाळप लांबल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा कोल्हापूर विभागाचा (कोल्हापूर-सांगली) ऊस हंगाम वेळेत सुरू होण्याची अपेक्षा ऊस उत्पादक व साखर उद्योगातूनही होत आहे. हंगाम तारीख निश्चित झाली असली अद्याप तरी कोणत्याही संघटनेने यंदाची भूमिका स्पष्ट केलेली नाही.
१५ नोव्हेंबरला कारखाने सुरू व्यवस्थितपणे सुरू झाल्यास मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ऊस हंगाम चालेल. पण हंगाम सुरू होण्यास अवधी लागल्यास उन्हाळ्यात ऊसतोड करणे अडचणीचे ठरेल. गाळप हंगामाचे दिवस वाढून शेतकऱ्यांचे पुढील पिकांचे नियोजन बिघडते. उसाचे पिकावर परिणाम होऊन वजनात व उताऱ्यांत घट येवू शकते यामुळे शेतकऱ्यांसह कारखान्याचेही नुकसान होवू शकते, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. आपला गाळप हंगाम वेळेत सुरू झाला नाही तर ऊस तोडणी यंत्रणा तिकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या खावटी व जनावारांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण होत असल्याचा या पूर्वीचा अनुभव असल्याने यंदा हंगाम सुरू होण्यास आडकाठी येवू नये, अशी अपेक्षा उद्योगाची आहे.
कोल्हापूर विभागाची स्थिती
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २३ कारखान्यांकडे १८७ लाख हेक्टर उसाची नोंद झाली आहे. त्यातून १४० लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांकडे १३७ लाख हेक्टर ऊस नोंद झाली आहे. त्यातून १२५ लाख टन ऊस उपलब्ध होवू शकतो. कोल्हापुरातील २३ कारखान्यांची प्रति दिन गाळप क्षमता १ लाख ३७ हजार टन तर सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांची प्रति दिन गाळप क्षमता ८८ हजार टन इतकी आहे. म्हणजे कोल्हापूर विभागात एकूण तोडणीचा ऊस २५५ लाख टन इतका आहे. विभागाची गाळप क्षमता २ लाख २५ हजार टन प्रति दिन इतकी आहे. म्हणजे या विभागातील गाळप हंगाम १२० ते १२५ दिवस इतका चालण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.