Nagpur News : ‘‘ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, ही आमची पहिल्या दिवसापासून भूमिका होती. ओबीसींच्या मनात जी भीती होती, तसा कुठलाही अन्याय यामुळे होणार नाही. ओबीसींवर अन्याय होईल, असा निर्णय सरकारने घेतलेला नाही,’’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. २७) स्पष्ट केले.
आंदोलनाच्या सांगतेनंतर फडणवीस म्हणाले, ‘‘‘‘मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात अतिशय चांगला मार्ग निघाला आणि आंदोलनाची सांगता झाली याचा मला आनंद आहे. कायद्याच्या आणि संविधानाच्या कक्षेतच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल, हे आम्ही प्रारंभीपासून सांगत होतो.
या आंदोलनाबाबत सरकार सकारात्मकच होते. या नव्या पद्धतीमुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न सुटेल. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा पुरावे नाहीत, त्यांना प्रमाणपत्र देण्याचा हा विषय नव्हता.
पण ज्यांच्या नोंदी आहेत आणि कायदेशीर अधिकार असताना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांना ते मिळण्याचा मार्ग यातून मोकळा केला आहे. त्याची पद्धत सोपी केली आहे. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे.’’
‘मराठा सर्वेक्षण सुरूच राहील’
‘‘मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षण सुरूच राहील. दरम्यानच्या काळात क्युरेटिव्ह याचिकासुद्धा लागली आहे. त्यातच यश मिळावे, हा आमचा प्रयत्न आहे. पण त्यात यश मिळाले नाही, तर सर्वेक्षण कामी येणारच आहे. सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’’ असेही फडणवीस म्हणाले.
‘घरे जाळणाऱ्यांवरील गुन्हे मागे नाहीत’
‘‘अंतरवाली सराटी किंवा अन्य ठिकाणांचे मराठा आंदोलकांविरुद्धचे गुन्हे आम्ही मागे घेतले आहेत. पण ज्यांनी घरे जाळली, सरकारी मालमत्तेचे नुकसान केले, असे गुन्हे मागे घेण्याची कुणाचीही मागणी नाही आणि त्यावर निर्णय घेतलेला नाही. कारण अशा गुन्ह्यांबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत,’’ असे फडणवीस यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.