
Solapur news : यंदा पाऊस कमी झाल्याने पेरणी केलेले बियाणे उगवले नाही. परिणामी, उत्तर सोलापूर तालुक्यात काहींना दुबार तर काही शेतकऱ्याना तिबार पेरणी करावी लागली, असे असताना पुन्हा पावसाने दडी मारल्याने तग धरुन राहिलेले सोयाबीनही माना टाकू लागल्याने होनसळ (ता.उत्तर सोलापूर) येथील शेतकऱ्याने सुमारे चार एकरवरील सोयाबीनवर ट्रॅक्टर चालवत ते काढून टाकले.
होनसळ येथील शेतकरी विलास साखरे यांनी यावर्षी खरीप हंगामात सोयाबीनची लागवड केली होती. यंदा कधी नव्हे, ती चार एकरवर त्यांनी सोयाबीन केले. सुरवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे पेरणी काहीशी खोळंबली होती. पण त्यातूनही पुन्हा त्यांनी पेरणी केली. त्याची वाढही चांगली झाली होती.
अलीकडेच त्यात आंतरमशागत करून डवरणी, खुरपणीची कामेही त्यांनी पूर्ण केली होती. आता पुढे या सोयाबीनला चांगल्या शेंगा लागून भरपूर उत्पादन पदरी पडेल, अशी त्यांना आशा होती. पण मागील काही दिवसात अचानकपणे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीनच्या झाडाच्या पानाची पूर्ण चाळणी झाली. त्यात पाऊसही लांबत चालल्याने सोयाबीन माना टाकू लागले. त्यामुळे निराश झालेल्या विलास साखरे आणि त्यांचे चिरंजीव रोहित साखरे यांनी थेट सोयाबीनवर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर फिरवून सोयाबीनचे पीक काढून टाकले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.