Cotton Disease : कपाशीवर ‘आकस्मिक मर’चे संकट

Climate Change Issue : बदलत्या हवामानामुळे कपाशी पिकावर आकस्मिक मरचे संकट ओढावले आहे.
Cotton Wilt Disease
Cotton Wilt DiseaseAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच बदलत्या हवामानामुळे कपाशी पिकावर आकस्मिक मरचे संकट ओढावले आहे. या संकटातून मार्ग काढण्याची धडपड शेतकरी करताना दिसत आहेत.

यंदाच्या खरीप हंगामात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड या प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये तुलनेने कपाशीची लागवड कमीच झाली आहे. आधी हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कपाशीवर वाढला होता. त्याचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतानाच अति व सततच्या पावसामुळे अनेक गाव शिवारातील कपाशीवर आकस्मिक मरचे संकट ओढवले आहे.

Cotton Wilt Disease
Cotton Wilt Disease : ‘आकस्मिक मर’ समस्येमुळे कापूस पिकाचे नुकसान

शास्त्रज्ञांनी यावर उपाय योजनेसाठी सल्ले दिले असले तरी ते अनेक शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचले नाही. किंवा पोहोचले तरी त्यांना उपाय करणे शक्य झाले नाही. बहुतांश भागात कपाशीचे पीक पाते-फुले ते बोंड धरण्याच्या अवस्थेत आहे. पीक पातेफुले ते बोंड धरण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आकस्मिक मर दिसून येत आहे. यामुळे पाते व बोंडगळ होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड या सर्व जिल्ह्यांत अनेक भागात आकस्मिक मरचे प्रमाण अधिक आहे.

Cotton Wilt Disease
Cotton Disease : गुलाबी बोंड अळीवर मिळविले नियंत्रण

कपाशीची लागवड कमीच

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत कपाशीची लागवड कमी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९४ हजार ७७१ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३ लाख ६२ हजार ४२० हेक्टरवरच कपाशीची लागवड झाली आहे. जालना जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९ हजार ५९ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ९१ हजार ६३३ हेक्टरवरच कपाशीची लागवड झाली आहे. बीड जिल्ह्यात तर या दोन्ही जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांत कमी कपाशी लागवड झाली आहे. बीडमधील कपाशीचे साधारण क्षेत्र ३ लाख ५५ हजार ४९३ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ६३ हजार १९४ हेक्टर म्हणजे केवळ ७४ टक्के क्षेत्रावरच कपाशीची लागवड झाली आहे.

पोळ्याच्या दिवसापर्यंत कापसाचे पीक चांगले होते. पण त्यानंतर अति व सतत पाऊस झाला अन्‌ पिकाची अवस्था वाईट झाली. अजूनही आमच्या पिकाच्या स्थितीत फारशी सुधारणा नाही.
रत्नमाला गाडे, शेतकरी, पेडगाव, जि. बीड
अति पाऊस झाला आणि पिकात आकस्मिक मरची समस्या तयार झाली. शास्त्रज्ञांनी सुचविलेले उपाय केले. परंतु दहा ते वीस टक्के पीक गेल्यातच जमा आहे.
सोमीनाथ आगलावे, शेतकरी, गोलटगाव, जि. छत्रपती संभाजीनगर
बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशा वेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मरची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात. त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासांच्या आत कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात. जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.
डॉ. सूर्यकांत पवार, श्री रामेश्वर ठोंबरे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com