Pandharpur News : सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस हायवेसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाद्वारे सुरू केलेला लढा आणि दुसरीकडे न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मागण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, ही दोन्ही कामे शेतकरी उत्तमरितीने करत आहेत, या लढ्याला आपला पाठिंबा असेल. शेतकऱ्यांचा हा लढा देशातील शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय आहे, असे मत ज्येष्ठ शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केले.
शेतकरी संघर्ष समिती, वृंदावन फाउंडेशन, प्रबोधन युवाशक्ती यांच्या वतीने पंढरपुरात नुकतीच राज्यस्तरीय भूमिपुत्र परिषद २०२४ आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी या संघटनेच्या अहवालाचे प्रकाशन टिकैत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, कृषी अधिकारी श्रीकांत शिंदे, कृषी अधिकारी गजानन नारकर आदी या वेळी उपस्थित होते.
श्री. टिकैत म्हणाले, की सुरत-चेन्नई एक्सप्रेस हायवेचा हा लढा दोन्ही पातळ्यांवर लढल्यामुळे शेतकऱ्याला आश्वासक न्याय मिळाला. एका बाजूला आंदोलने व दुसऱ्या बाजूने समितीशी जुळलेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात संविधानिक लढा दिला त्याबद्दल सर्व बाधित शेतकऱ्यांचे कौतुक वाटते.
शेतकरी हीच जात माना
महाराष्ट्र ही लढवय्या शूरांची भूमी असून, आम्ही वेळोवेळी कोणत्याही पातळीवरती संघर्षासाठी सहकार्य करू. आज महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत, अनेक मोठे नेते आहेत, मात्र महाराष्ट्रामध्ये आजही रोज सात ते आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्याची कुठेही दखल घेतली जात नाही.
उत्तर भारतामधला शेतकरी आत्महत्या का करत नाही, मग महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या का करतो, याचे कारण सर्व संघटना व नेत्यांनी शोधले पाहिजे. जात व पक्ष सोडून त्यापुढे ‘शेतकरी’ हीच जात म्हणून लक्षात ठेवून काम केल्यास निश्चित शेतकऱ्याला न्याय मिळेल, असेही टिकैत म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.