रूह कभी विधवा नहीं होती...

कोणत्याही समाजात स्त्रीच्या दृष्टीने पतीचे निधन ही मोठी दुर्दैवी आपत्ती ठरते. तिचे तसेच मुलांचे आयुष्यच बदलून जाते.
Widow Tradition
Widow TraditionAgrowon

कोणत्याही समाजात स्त्रीच्या दृष्टीने पतीचे निधन (Husband Death ) ही मोठी दुर्दैवी आपत्ती ठरते. तिचे तसेच मुलांचे आयुष्यच बदलून जाते. आई, मुले, नातेवाईक व इतर संबंधित व्यक्तींचे आपापसातील संबंध यांत अनेक फेरबदल व फेररचना घडून येतात. मानसिक, आर्थिक ताण, एकाकीपणा, शारीरिक कुचंबना, असुरक्षिता, सहानुभूती तसेच अपराधीभावही जागविणाऱ्या विचित्र नजरा उबग आणतात.

विवाहामुळे येणारी सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य, सहजीवनाचा आनंद या गोष्टी मिळतात यात दुमत नाहीच. पण त्या एका व्यक्तीच्या जाण्याने तिच्या अस्तित्वाला अर्थच उरू नये, हा दावा नि कावा निश्चितच फोल आहे. एक माणूस म्हणून हे अन्यायकारकच आहे. कठोर धार्मिक, नैतिक मूल्ये, तसेच काय खावं, काय नेसावं, कुठं जावं या सर्वांवर समाजाचं बारीक लक्ष असतं. तुझं आयुष्य आता जगण्यालायक नाही असे लोकांच्या डोळ्यांतले भाव तिला वारंवार सती जाण्याचा अनुभव देतात. तिचं हसणं, तिचा साज-शृंगार, तिचं रंगांचं वेड, तिच्या आवडी निवडी कशालाही आता किंमत नसते. वासनेचा वळू नि संयमाचा वेळू यांच्यातील द्वंद्वं सतत धुमसत राहते.

कुंकवाच्या लाल वर्तुळात आणि जोडवी, बांगड्या, मंगळसूत्र यासारख्या प्रतिकांत सौभाग्याची व्याख्या करण्यात कुठला बुद्धिवाद आहे समजत नाही. त्यात अविकसित भागात शिक्षण, रोजगार व कायदेशीर हक्कांची जाणीव कमी प्रमाणात असल्याने महिलांची स्थिती अजूनच दयनीय होते.

अमृता प्रीतम म्हणतात,

"देह कभी दुल्हन नहीं बनती

रुह कभी विधवा नहीं होती.."

सौभाग्य, अहेवमरण, वैधव्य, परित्यक्त यापल्याड जाऊन एक मन आणि भावना असलेलं माणूस म्हणून कधी बघणार आहोत आपण यांच्याकडे? पूर्वीच्या काळी मृत पतीचा मृत्यूनंतरही आपल्या पत्नीवर हक्क असतो, या भ्रामक समजुतीमुळे परलोकात तिने त्याची सेवा करावी, ही भावना भारतीय समाजात तीव्र झाली. सतीप्रथेला धार्मिक अधिष्ठान दिले गेले तरी कोणत्याही धर्मग्रँथात या प्रथेचा स्पष्ट पुरस्कार नाही. प्राचीन इजिप्त व जर्मनीमध्येही विधवेला तिच्या मृत पतीच्या थडग्यात जिवंत पुरत असत. प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीमध्येही विधवांच्या पुनर्विवाहाला फारसे प्रोत्साहन नव्हते. प्रारंभीच्या ख्रिस्ती समाजातही पुनर्विवाह, व्यभिचाराइतकाच निंद्य व त्याज्य मानला जाई.

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या गावी नुकताच म्हणजे १७ मे २०२२ रोजी विधवा प्रथा बंद करण्याचा शासननिर्णय मंजूर केला. त्यांना सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक प्रवाहात सामील करून घेण्याचा हा निर्णय बदलत्या विज्ञानयुगास साजेसा आणि स्तुत्य आहे. त्यानिमित्ताने हा लेखनप्रपंच!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com