Buldhana News : या वर्षी रब्बी हंगामात लागवड केलेल्या हरभऱ्याची काढणी जोरात सुरू असून, उत्पादनात घट आल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या भागात काही शेतकऱ्यांना एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंत उतारा येत असून एवढ्या उत्पादनात खर्चही भागणार नसल्याने आर्थिक कोंडी तयार झाली आहे.
यंदाच्या रब्बीत हरभऱ्याचे पीक ऐन फुलोऱ्यात, घाट्याच्या अवस्थेत असताना पावसामुळे व धुक्याने फुल व घाटे गळती झाली. घाट्यातील दाण्याचा आकार लहान तयार झाला. आता पीक काढणी सुरू झाली तेव्हा पिकाचे उत्पादन कमालीचे कमी निघत असल्याने शेतकरी संकटात सापडला.
यंदा खरीप हंगामात सोयाबीनचे पीक हातातून गेले आहे. आता रब्बीत हरभऱ्यानेही दगा दिल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला असून मेटाकुटीस आला आहे. या वर्षी खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकावर ऐनवेळी येलो मोझॅक या रोगाने व ऑगस्ट महिन्यात पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला होता.
खरिपात सोयाबीनचे पीक एकरी तीन ते चार क्विंटल निघाले. तरीही शेतकऱ्यांनी न डगमगता रब्बीत हरभरा पिकाची मोठ्या आशेने पेरणी केली होती. शेतकऱ्यांना हरभरा पिकापासून आशा होती. मात्र, सोयाबीनसारखेच हरभऱ्याचे उत्पादन कमी आले. त्यात कोणाला एकरी चार, तर कोणाला पाच क्विंटल उत्पादन येत आहे. त्यात हरभरा पिकाच्या देखरेखीवर हरभरा उत्पादनात वाढीसाठी महागडे औषधी खरेदी करून फवारणी केली. निसर्गाने दगा दिल्याने लागवड खर्च निघणेही कठीण झालेले आहे.
उत्पादना पोठापाठ दरही कोलमडले
सोयाबीनला दोन वर्षांपूर्वी ७८०० रुपयापर्यंत दर होता. या वर्षी तर ४२०० ते ४३०० रुपये आहे. तर डॉलर हरभऱ्याचे दर गेल्या वर्षी १४ हजार तर बियाण्याचे दर १६ ते १७ हजारपर्यंत होते. आता १० हजार रुपयांच्या आत डॉलर हरभऱ्याचा दर आहे. त्यामुळे खरीप-रब्बी हंगामाने बळीराजाला दगा तर दिला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.