Latur News : येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात खरेदीदार व अडत्यातील वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे सहाव्या दिवशीही अडत बाजारात शुकशुकाट राहिला. बाजार समितीच्या सभापतींनी दोनही गटांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण, दोनही गट आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने ही बैठकही निष्फळ ठरली आहे. त्यामुळे शनिवारीदेखील शेतीमालाचा सौदा निघू शकला नाही. सध्या अडत बाजारात किमान पंधरा हजार क्विंटल शेतीमाल पडून आहे.
गेल्या काही वर्षांत काही खरेदीदारांनी कोट्यवधींची खरेदी करून दिवाळखोरी जाहीर केली. याचा मोठा फटका अडत्यांना बसला आहे. दिवाळखोरी काढलेल्या खरेदीदारांवर काहीच कारवाई होत नसल्याने अडत्यांमध्ये असंतोष आहे. शेतीमाल विकेल्यानंतर पेमेंट २४ तासांच्या आत मिळावे किंवा चार-पाच दिवसांचा पुढील धनादेश तरी खरेदीदारांनी द्यावा, अशी मागणी अडत्यांची आहे. यातून गेल्या सोमवारपासून अडत बाजार बंद आहे.
बैठकांवर बैठका, पण तोडगा निघेना
बाजार बंद झाल्यापासून बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. त्यात शनिवारी (ता. ६) पुन्हा बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांनी खरेदीदार व अडत्यांची बैठक घेतली. काही तरी तोडगा काढून बाजार सुरू करावा, शेतकऱ्यांचे नुकसान करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पंधरा हजार क्विंटल शेतीमाल पडून
सहा दिवसांपासून अडत बाजार बंद आहे. सध्या खरिपाचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. मात्र, असे असताना बाजार बंद आहे. सध्या या बाजारात किमान पंधरा हजार क्विंटल शेतीमाल अडतीवर पडून आहे. त्याचा सौदाच होत नाही. त्यामुळे शेतकरीही अडचणीत आले आहेत. सौदा कधी निघणार, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.