
Mumbai News: सत्ताधारी पक्षाला साथ देऊन नियमबाह्य पद्धतीने विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती कामकाज करतात. विरोधी पक्षांच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून, नियमबाह्य रीतीने महत्त्वपूर्ण चर्चा करून विरोधी पक्षांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे गुरुवारी (ता. २०) केली.
राज्यपाल राधाकृष्णन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भूमिका ही सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी धोरण सुचविणारी असते.
महाराष्ट्र विधान परिषद व विधानसभा सभागृहांमध्ये सभापती व अध्यक्ष यांच्याकडून सभागृहाच्या कामकाजात पक्षपातीपणा व एकांगी भूमिका घेतली जात आहे. दोन्ही सभागृहांच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता सभागृहाचे कामकाज नियमबाह्य चालविले जात आहे.
विरोधी पक्ष आणि विरोधो पक्षनेत्यांना सभागृहात सभापती व अध्यक्ष यांच्याकडून पक्षपाती वागणूक मिळत असून सभागृहात विरोधी पक्षांच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संविधानिक हक्क डावलला जात असल्याने त्यांच्या हक्कांचे संरक्षण होण्यासाठी ही बाब आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.
विरोधी पक्षांच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून, नियमबाह्य रीतीने महत्त्वपूर्ण चर्चा करताना विरोधी पक्षांची अडवणूक केली जात आहे. विधानसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांना कपात सूचना मांडण्याचा अधिकार असताना त्यांच्या सूचनांना सरकारकडून उत्तर दिले जात नाही. पुरवणी मागणीच्या चर्चेच्या वेळी संबंधित खात्याचे मंत्री व राज्यमंत्री सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
सभागृहाच्या अदृश्य गॅलरीमध्ये संबंधित खात्याचे सचिवसुद्धा उपस्थित नसतात. संबंधित खात्याचे राज्यमंत्री उपस्थित असताना खात्याशी संबंधित नसलेल्या मंत्र्यांना चर्चेस उत्तर देण्याचा अधिकार दिला जात आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विधिमंडळ गटनेते आमदार आदित्य ठाकरे, नाना पटोले, अनिल परब, भास्कर जाधव, भाई जगताप, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुनील राऊत, सचिन अहिर, आनंद बाळा नर, प्रवीण स्वामी, अभिजित वंजारी, अजय चौधरी, सुनील शिंदे, अरुण शेठ, ज. मो. अभ्यंकर, मनोज जामसुतकर, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील व वरुण सरदेसाई उपस्थित होते.
सभागृहांचा विश्वास गमावला
विधान परिषदेच्या सभापतींनी सभागृह चालविताना निष्पक्षतेचा अभाव दाखवला असून, त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. तसेच विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृह चालविताना निष्पक्षतेचा अभाव दाखविला आहे. राज्यपालांनी याप्रकरणी स्वतः लक्ष घालून विरोधी पक्षांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.