
Sangli News : देशातील यंदा सुमारे ४० हजार हेक्टरवर मृग बहर शेतकऱ्यांनी धरला आहे. यंदा डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या राज्यात पुरेसा पाऊस आणि पोषक वातावरण राहिल्याने पीक चांगले बहरले आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून वातावरणातील बदलांमुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक संकटात सापडले आहेत.
देशात गेल्या तीन वर्षांपूर्वी सुमारे ५० ते ६० हजार हेक्टरवर मृग बहर धरला जायचा. मात्र फुलकळी आणि फळ आकार मोठा झाला की अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस या साऱ्यांमुळे हातातोंडाशी बागेवर तेलकट, करपा आणि फळकुजवा या रोगांचा
प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान झाले. परिणामी, डाळिंब उत्पादकांनी हंगामात बदल केला. त्यामुळे गेल्या वर्षापासून मृग बहरातील डाळिंबाच्या क्षेत्रात १० ते २० हजार हेक्टरने घट झाली असल्याचा अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे.
यंदा देशात डाळिंबाचा अंदाजे ४० हजार हेक्टरवर मृग बहर धरला आहे. हंगामाच्या सुरुवातीला पाण्याची कमतरता भासली, परंतु पाण्याची उपलब्धता करून बहर उत्तमरीत्या साधला आहे. डाळिंबाला पुरेसा पाऊस आणि पोषक वातावरण असल्याने काडी चांगली तयार होण्यास मदत झाली. त्यामुळे फुलकळी चांगली निघाली. फुलाचे सेटिंगही चांगले झाले. मात्र सेटिंग होण्यास विलंब झाला. सध्या १०० ग्रॅम पासून २०० ग्रॅम आकाराची फळे लागली आहेत.
दरम्यान, वातावरणात बदल होऊ लागला आहे. त्यामुळे या बदलाचा फटका डाळिंबावर होण्यास सुरुवात झाली आहे. डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ लागला आहे.
नोव्हेंबरमध्ये येणार विक्रीस डाळिंब सर्वसाधारणपणे गणपती उत्सवानंतर काढणीस येतात. परंतु पाऊस आणि पाण्याच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी मृग बहर धरण्याचे नियोजन मागे पुढे केले आहे. त्यामुळे यंदा नोव्हेंबरमध्ये डाळिंब विक्रीस येण्याची शक्यता आहे. यंदाही डाळिंबाला चांगले दर मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.