Sangli News : राज्यातील आंबिया बहारातील डाळिंबावर पाणीटंचाईचे अभूतपूर्व संकट आणि वाढत्या उष्णतेचे दुहेरी संकट ओढावले आहे. याचा फटका आंबिया बहारातील डाळिंबाला बसला आहे. यामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे अपेक्षित फळ धारणा झाली नसल्याने डाळिंबाच्या झाडाला फळांच्या संख्येत तब्बल ५० टक्क्यांनी घट झाली असल्याने उत्पादनही घटणार आहे. परिणामी यंदाचा डाळिंब हंगाम काळवंडला असून शेतकऱ्यांवरील संकटाचे शुक्लकाष्ठ संपण्याचे चित्र नाही. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
राज्यात दरवर्षी सर्वसाधारपणे ५० हजार हेक्टरवर आंबिया बहार साधला जातो. मुळात आंबिया बहार ज्या भागात शाश्वत पाण्याची सुविधा असते अशाच ठिकाणी धरला जातो. परंतु गतवर्षी कमी पाऊस झाला. पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई भासू लागली. मात्र, पाणी पुरेल या आशेवर राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आंबिया बहार धरला.
यंदा सुमारे २५ हजार हेक्टरवर या बहरातील डाळिंब शेतकऱ्यांनी साधले. पण पाण्याची दिवसेंदिवस टंचाई तीव्र झाली. पाणी कमी पडू लागले. त्यातच तापमान वाढू लागले. पाणी कमी पडल्याने बागेला ताण बसला. सेटिंग झाले नाही. परंतु शेतकऱ्यांनी नेटके व्यवस्थापन करत बागा साधल्या. यासाऱ्याचा परिणाम फुल कळी निघण्यावर झाला. काही भागात फुल कळी निघाली पण फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली.
वास्तविक पाहता, या हंगामात प्रति झाडाला अंदाजे १०० ते १५० हून अधिक फळांची संख्या असते. काढणीच्या वेळी फळाचे वजन ४०० ते ४५० ग्रॅमच्या पुढे मिळते. मात्र, यासाऱ्या संकटामुळे फळांची संख्या कमी झाली असल्याचे चित्र आहे. सध्या प्रति झाडाला ५० ते ७५ इतकी फळांची संख्या आहे.
त्यामुळे पन्नास टक्क्यांनी फळांची संख्या कमी असल्याने उत्पादनही तितकेच घटणार आहे. जून-जुलै या दरम्यान या बहारातील डाळिंबाची काढणी सुरू होईल. काढणीच्या वेळी फळाचे वजन अंदाजे २५० ते ३०० ग्रॅम इतके मिळेल असे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे डाळिंबावर पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचे असे दुहेरी संकट आल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवरील संकटाचे शुक्लकाष्ठ संपण्याचे चिन्हे दिसत नाहीत.
डाळिंब फळे फुटू लागली...
राज्यात गेल्या काही दिवसापासून पूर्व मोसमी पाऊस पडत आहे. पाऊस पडल्यानंतर ४० अंशापेक्षा अधिक तापमानाचा पारा आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा फटका फळांना बसत आहे. परिणामी पाऊस आणि वाढते तापमान यामुळे डाळिंब फुटू लागले आहेत. त्यामुळे संकटाची मालिका सुरूच आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.