Land Dispute : वाटेकरीच झाला जमिनीचा कूळ

Property Dispute : एका लहानशा गावात सदानंद नावाचा एक शेतकरी राहत होता. सदानंदच्या शेताशेजारी महिपत नावाच्या शेतकऱ्याची जमीन होती. सदानंदने आपली स्वतःची जमीन महिपतला वाट्याने कसायला सांगितली.
Agriculture Land Dispute
Agriculture Land DisputeAgrowon
Published on
Updated on


- शेखर गायकवाड

Descent Law : एका लहानशा गावात सदानंद नावाचा एक शेतकरी राहत होता. सदानंदच्या शेताशेजारी महिपत नावाच्या शेतकऱ्याची जमीन होती. सदानंदने आपली स्वतःची जमीन महिपतला वाट्याने कसायला सांगितली. सदानंद आणि महिपतमध्ये असे ठरले, की शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अर्धा-अर्धा वाटा दोघांनी घ्यायचा त्याप्रमाणे दोघांमध्ये तोंडी करार झाला.
तीन ते चार वर्षे लोटल्यानंतर सदानंदला असे वाटू लागले, की आपल्याला हा अर्धा वाटा न परवडणारा आहे. त्यामध्ये आपले स्वतःचे नुकसान होत आहे, म्हणून सदानंद महिपतकडे गेला व त्याला म्हणू लागला, की जमीन वाट्याने द्यायला मला आता परवडत नाही, मी आता स्वतः जमीन कसणार.

त्यावर वाटेकरी महिपत म्हणाला, ‘‘मी आता असे करू शकत नाही, ‘‘मी तर या जमिनीचा आता कायदेशीर कूळ झालो आहे!’’ हे ऐकून सदानंदला धक्का बसला. सदानंदला काय करावे काहीच कळत नव्हते. सदानंद महिपतला विनवणी करू लागला, की माझ्या जवळचा आहे म्हणून मी तुला जमीन वाट्याने दिली होती, पण तू तर माझा विश्‍वासघात केला. त्यावर महिपत सदानंदला म्हणाला, ‘‘मला ते काही माहीत नाही. मला जे वाटले ते मी केले, आता तुला काय करायचे ते तू कर. एवढेच नाहीतर वाटेकरी म्हणजे महिपतने आपण स्वत: या जमिनीचा कूळ असल्याचा दावा देखील तहसीलदार कोर्टात दाखल केला. त्यामध्ये आपण ही सदानंदची जमीन अर्ध्या वाट्याने कूळ म्हणून कसतो असे नमूद केले.

सांगावयाचे तात्पर्य म्हणजे, जमिनीसंबंधीच्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास न करता व्यवहार केल्यास संकटच ओढवणार! कायदेशीररीत्या दुसऱ्याची जमीन कसणारी व त्याबद्दल खंड देणारी व्यक्ती म्हणजे कूळ होय! कूळ सिद्ध होणे ही अलीकडच्या काळात अवघड गोष्ट असली, तरी असा दावा मात्र केला जाऊ शकतो.

Agriculture Land Dispute
Land Dispute : कुळांच्या जमिनीचा गुंता

कूळ कायद्याचा कचाटा

एका गावात धनाजी नावाचा एक मोठा जमीनदार राहत होता. धनाजीरावच्या कुटुंबात एकूण दोन-अडीचशे एकर जमीन होती. ही सगळी जमीन धनाजी आपल्या कुळामार्फत कसून घेत होता. १९५७ मध्ये कुळकायदा आल्यावर सर्व जमिनीत कुळे असताना सुद्धा ही जमीन आपण स्वतः म्हणजे धनाजी कसतो अशी भूमिका धनाजीने घेतली व कुळांचा या जमिनीशी काहीही संबंध नाही, असे धनाजीने शपथेवर सांगितले. काही कुळांना दम देऊन तर काही कुळांना आमिष दाखवून धनाजीने कुळांकडून प्रतिज्ञापत्रांवर तसे लिहून घेतले.

Agriculture Land Dispute
Soldier Land : सैनिकाची जमीन आणि कूळ

त्यानंतर मात्र १९६१ मध्ये सीलिंग कायदा आला. सीलिंग कायद्यामध्ये मालकीच्या व वहिवाटीच्या अशा दोन्ही जमिनी विचारात घेतल्या जातात. सीलिंगमध्ये जमीन जाऊ नये म्हणून या सर्व जमिनी कुळांच्या ताब्यात आहेत व आपल्याकडे सीलिंग मर्यादेपेक्षा कमी जमीन आहे असे सांगायला धनाजीने सुरुवात केली व सर्व कुळांची परत प्रतिज्ञापत्रे सुद्धा सादर केली. कूळ कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी जमीन कुळांकडे नसून मालक म्हणून आपण स्वतः कसतो अशी भूमिका घेतलेल्या धनाजीरावला थोड्याच वर्षात पुन्हा सीलिंग कायद्यात जमीन सरकारजमा होऊ नये म्हणून भूमिका बदलावी लागली.
सांगावयाचे तात्पर्य म्हणजे, लोक स्वार्थी असतात व स्वतःला सोईस्कर अशी भूमिका घेतात. कायदा हा व्यक्तिनिरपेक्ष असतो. परंतु माणसे मात्र धोरणी व कावेबाज असतात.

- शेखर गायकवाड
ई-मेल- shekharsatbara@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com