Land Dispute : कुळांच्या जमिनीचा गुंता

Shekhar Gaikwad : स्वातंत्र्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी देशातील गरिबी संपविण्याचे काम करण्यासाठी सर्वोदय चळवळ सुरु केली. या चळवळीला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आणि जनजागृतीबरोबरच सामाजिक निर्णयांमध्ये लोकसहभाग वाढला.
Agriculture Land Dispute
Agriculture Land DisputeAgrowon
Published on
Updated on

Bhoodan Movement : आचार्य विनोबा भावे यांनी सन १९५१ मध्ये भूदान चळवळीला सुरुवात केली. ही चळवळ बघता-बघता संपूर्ण भारतभर पसरली. विनोबा भावे ज्या गावी जात तेथील जमीनदार लोक स्वतःहून भूमिहीन लोकांसाठी काही जमीन दान देत असत. एका गावात जयवंतराव नावाचा एक जमीनदार होता. त्याची गावात एकूण २०० एकर जमीन होती. त्यांपैकी ३०-४० एकर जमीन ही पडीक व माळरानाची होती व चांगल्या जमिनीपैकी सुमारे १०० एकर जमीन कुळाकडून कसली जात होती. ज्या वेळी विनोबा भावे पदयात्रा करीत त्या गावात येणार होते. त्या वेळी गावकऱ्यांनी सर्वांत मोठ्या जमीनदार असलेल्या जयवंतराव यांना काही जमीन देण्याचा आग्रह धरला. एवढी मोठी व्यक्ती आपल्या गावात येत आहे आणि तुम्ही तर सर्वांत मोठे जमीनदार आहात असे सांगून गावकऱ्यांनी जयवंतरावांना काही तरी शब्द देण्याची गळ घातली.

Agriculture Land Dispute
Land Donation : बिहारमध्ये होणार पुन्हा भूदान यज्ञ

विनोबा भावे ज्या दिवशी गावात आले त्या वेळी चावडी समोर सर्व गावकरी व आजूबाजूच्या चार-पाच गावचे हजारो लोक जमले होते. जयवंतरावांनी विनोबा भावेंचे भाषण ऐकल्यानंतर स्वतःहून उठून मी माझी ८० एकर जमीन स्वखुशीने भूदान चळवळीला दान देत आहे असे सांगितले. गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. विनोबा भावेंच्या हस्ते जयवंतरावांचा सत्कार करण्यात आला. गावासमोरच जयवंतरावांनी दानपत्रावर सह्या पण करून दिल्या. या कार्यक्रमाला जयवंतरावाच्या जमीन कसणारी आणि कुळेसुद्धा हजर होती. कुळांना वाटले आपला जमीन मालक किती मोठा दानशूर व्यक्ती आहे. तीन-चार वर्षे उलटली. कुळांकडून नेहमीप्रमाणेच आपल्या वहिवाटीच्या जमिनी कसल्या जात होत्या व सर्व जमिनींचा ताबा हा कुळांचा होता. एका कुळाने कर्ज काढायला म्हणून सातबारा उतारा काढला, त्या वेळी त्याला धक्काच बसला. कारण त्याच्या सातबारावर आता जमीन मालकाचे नाव नव्हते. सर्वच कुळांच्या सातबारावरील मालकाची नावे कमी झाली होती.

थोडक्यात काय तर, स्वतःची सुपीक जमीन स्वतःकडे ठेवून पडीक व कुळांच्या ताब्यातील ८० एकर जमीन जयवंतरावने भूदान मंडळाला दिली होती. अशा पद्धतीचे भूदान हे दान होऊ शकते का, असा प्रश्‍न कुळांना पडत राहिला. कुळांची जमीन दान देऊन जयवंतराव हा मनाचा किती उदार आहे, हे असे चित्र गावकऱ्यांना दिसले आणि कुळांना मात्र कूळ कायद्यानुसार जयवंतराव विरुद्ध दावे लावावे लागले. प्रॉपर्टी ही माणसाची अशी गुंतागुंत करून टाकते.

शेखर गायकवाड

निवृत्त प्रशासकिय अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com