
Ratnagiri News : रत्नागिरीत पर्यटन वाढीसाठी टेंट सिटी उभारण्याचा उद्देश आहे. त्याची सुरुवात पुढील एक महिन्यात केली जाईल, असे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्या स्मारकात सुधारणा करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह कार्यक्रमासाठी आलेल्या मंत्री लोढा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ते म्हणाले, की रत्नागिरीतील एमटीडीसी विभागासाठी नवीन कर्मचारी नियुक्त केले जातील. येत्या ६ महिन्यांत पर्यटन विभागातील रिक्त पदे भरण्यात येतील. पर्यटन वाढीसाठी स्थानिक नागरिकांनी आपल्याला चांगल्या सूचना कराव्यात त्या नक्कीच अंमलात आणल्या जातील.
निवास न्याहारी योजनेत संबंधित काही अडचणी असल्यास त्याबाबत तुम्ही थेट माझ्याशी बोला. तीन महिन्यांत योग्य प्रस्ताव असेल तर तो नक्कीच पूर्ण करू. जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी आवश्यक प्रयत्न करू. हाऊसबोट प्रकल्पाबाबत अडचणी माझ्याकडे पाठवा, त्यावर तोडगा काढला जाईल.
जिल्ह्यात पायाभूत सुविधांची कमतरता आहे. प्रश्न अनेक आहेत, मात्र माझ्याकडून ते सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वीस लोकांच्या पर्यटन समितीचे गठन केले आहे. पर्यटन विभागात सुयोग्य बदल झाल्याचे येत्या दोन वर्षांत दिसून येईल. जिल्ह्यात एमटीडीसीच्या नऊ जागा आहेत, मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीने यातील ३ जागा आपल्या हातून गेल्या. त्या बदल्यात नवीन जागा शोधण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रत्नागिरीत पुढील दोन वर्षांत एकतरी पंचतारांकीत हॉटेल बनवण्याचा उद्देश आहे. तसेच एमटीडीसीची सध्याची रिसॉर्ट अद्ययावत करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
अन्य खात्यांसंदर्भात मंत्री लोढा म्हणाले, की महिला बाल विकास खात्यातर्फे काही नवीन कार्यक्रम घेतले जाणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला समस्या निवारण शिबीर आयोजित केले जाणार असून सर्व ग्रामपंचायतीमध्ये दोन महिलांचा सन्मान केला जाईल.
जिल्ह्यात नऊ आयटीआय आहेत, त्यांच्या नूतनीकरणासंदर्भात चर्चा केली. जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी स्वतःच्या जागेत नाहीत. त्यासाठी अंगणवाडींना जिल्हा परिषदेच्या शाळेत समावून घ्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेला केल्या आहेत.
बंद केलेल्या साहसी खेळांवर निर्णय
पर्यटन रोजगाराचे नवीन साधन आहे. शासनाने २५ मे पासून समुद्रीपर्यटनातील साहसी खेळ बंद केले असल्याची माहिती दीपक पटवर्धन यांनी मला दिली असून. याबाबत आपण मुंबईत मीटिंग घेऊन तोडगा काढू. यावर पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.