Crop Damage Survey : खानदेशात वादळात नुकसानीचे पंचनामे सुरूच

Rain Update : खानदेशात वादळात केळीसह अन्य पिके, घरगोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील १० ते १२ दिवसात विविध भागात वादळ व पाऊस झाला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Jalgaon News : खानदेशात वादळात केळीसह अन्य पिके, घरगोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील १० ते १२ दिवसात विविध भागात वादळ व पाऊस झाला आहे. यामुळे केळीसह भाजीपाला व अन्य पिकांची हानी झाली आहे.

शेडनेटही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात फाटून नुकसान झाले आहे. पॉलीहाऊसचे अंशतः नुकसानही धुळ्यातील साक्री, जळगावातील जळगाव, भुसावळ व अन्य भागात झाले आहे. परंतु शेडनेट, पॉलीहाऊसचे नुकसान किती व कसे गृहीत धरावे, त्यास कशी भरपाई द्यावी, त्याची टक्केवारी व नुकसानीची माहिती कशी द्यावी, असा मुद्दा कृषी यंत्रणांसमोर आहे.

पॉलीहाऊसचे अल्प नुकसान झाल्यासही त्याची दुरुस्ती व अन्य कार्यवाही करावी लागते. त्यात वेळ व निधी वाया जातो. यामुळे या बाबी लक्षात घेऊन भरपाई निधी व टक्केवारी निश्चित करायला हवी, अशी मागणीही आहे. अनेक भागात शेडनेट व पॉलीहाऊसच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

Crop Damage
Crop Damage Survey : पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्णच

केळीची हानी खानदेशात सर्वत्र झाली आहे. त्यात वेगाच्या वाऱ्यात पाने फाटून नुकसान झाले आहे. परंतु प्रशासन पाने फाटल्यासंबंधी कुठलेही नुकसान गृहीत धरीत नाही. विमा कंपनीदेखील याबाबत दुर्लक्ष करीत आहे. पाने फाटल्याने केळी पिकाचे ३० ते ३५ टक्के नुकसान झाले आहे. उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. परंतु याबाबत कृषी यंत्रणा दखल घ्यायला तयार नाहीत.

केळीची सुमारे दीड हजार हेक्टरवर खानदेशात हानी झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात एक हजार हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. फळ पीकविमा योजनेतून भरपाईसाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अॅपवर नुकसानीची पूर्वसूचना दिली आहे. विमा कंपनीकडून पंचनामे केले जात आहेत. विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यासंबंधी लक्ष देवून कार्यवाही करून घेत आहेत.

Crop Damage
Crop Damage Survey : पंचनाम्यांच्या फेरचौकशीसाठी विमा अधिकारी तळ ठोकून

परंतु कृषी विभाग किंवा शासकीय यंत्रणा आपली जबाबदारी पार पाडत नसल्याची स्थिती आहे. अनेक भागात नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी प्रशासनाने बेदखल केली आहे. तर काही भागात कृषी सहायक, तलाठी आदी मंडळी पोचत नसल्याने पंचनामे अपूर्ण आहेत. केळीबागा आडव्या झाल्याने १०० टक्के हानी झाली आहे.

आता या बागांतील घड, केळीचे खांब काढून शेत स्वच्छ करावे लागणार आहे. त्यासाठी मोठी मजुरी किंवा खर्च येत आहे. केळी भुईसपाट झालेल्या क्षेत्रात स्वच्छता करू न त्यात खरिपातील पिके पेरणी करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही भागात पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर काही भागात पंचनामे सुरू आहेत. जळगाव, यावल व रावेरात केळीची मोठी हानी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

केळी पिकहानीबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी क्षेत्रपाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु पंचनामे करू न तातडीने भरपाई दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.

या भागांत पंचनामे अपूर्ण...

जळगाव जिल्ह्यात रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, यावल, जामनेर, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबाराताली शहादा, तळोदा, अक्कलकुवा आदी भागात केळी पिकाला मोठा फटका वादळाने बसला आहे. परंतु पंचनामे अपूर्ण आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com