Nashik News : गेल्या दीड वर्षात केंद्र सरकारचे ग्राहकधार्जिणे धोरण व केलेल्या हस्तक्षेपामुळे कांदा उत्पादकांचे अर्थकारण अडचणीत आले. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यांपर्यंत उत्पादन खर्चही निघाला नव्हता. तर चालू वर्षीही निर्यात शुल्क व किमान निर्यात मूल्यामुळे दरवाढीला ब्रेक लागला होता. मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिलासा मिळेल व दरवाढ होईल या आशेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार आवारात आवक नियंत्रित केली. परिणामी, मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने मे महिन्यापासून दरात सुधारणा दिसून आली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात चालू जून महिन्यात कांद्याने प्रथमच प्रतिक्विंटल २ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
मागील वर्षी कांदा काढणी होऊन साठवल्यानंतर शेतकरी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री होत असतानाही दराचा लाभ नव्हता. २०२३-२४ या आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै दरम्यान उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळाला. ऑगस्ट महिन्यात काहीशी सुधारणा झाली. मात्र २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याने बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. त्यासाठी कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क व त्या वेळी ८५० डॉलरपर्यंत किमान निर्यात मूल्य लागू केले होते. मात्र मागणी असूनही दरात अस्थिरता होती. मात्र डिसेंबर महिन्यात केलेल्या निर्यातबंदीने अडचणी वाढल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांचा रोष विचारात घेता काहीतरी दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे निर्यातबंदी मागे घेण्यासह निर्यात शुल्क व किमान निर्यात मूल्य रद्द होईल, अशी आशा लागून होती. मात्र काहीही धोरणात्मक निर्णय झाले नाहीत. अखेर शेतकऱ्यांनी बाजारात आवक कमी आणण्यास सुरुवात केली. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने दरात सुधारणा दिसून आली आहे.
नियंत्रित आवकेमुळे दराचा लाभ
लेट खरीप कांदा हंगामात प्रथमच निर्यातबंदी झाल्याने कांदा उत्पादकांना जवळपास ५ हजार कोटी रुपयांचा तोटा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा हंगाम उभा करून उत्पादन घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असताना केंद्र सरकारचा हस्तक्षेप अडचणीचा ठरत होता. मात्र यंदा उत्पादनात असलेली घट, त्यात मागणीत होत असलेली वाढ व नियंत्रणात होणाऱ्या आवकेमुळे कांदा विक्री दराचा फायदा होत असल्याचे चित्र आहे.
बाजार समित्यांमधील दरस्थिती
बाजार समिती मार्च एप्रिल मे जून
पिंपळगाव बसवंत १,५५५ १,३३५ १६८१ २,३०५
लासलगाव १,४८६ १,३५२ १,५२८ २,२६०
नामपूर १,३०० १२५० १,६५० २,०००
मनमाड १,४४० बाजार बंद १,५७५ २,०००
सिन्नर १,४६५ १,३०० १,६०० २,३००
येवला १,४५१ १,३०० १,५५० २,३५०
चांदवड १,४६२ १,३१२ १,६२७ २,०९०
नांदगांव १,४०० १,३०० १,५०० २,२००
सटाणा १,४२० १,३११ १,६३० २,३००
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.