
Nashik News : यंदा पावसाने ओढ दिल्याने सरासरीपेक्षा १२५ मिलिमीटर कमी पावसाची नोंद निफाड तालुक्यात झाली आहे. त्यामुळे गोदाकाठ परिसरात उसाच्या उत्पादनात मोठी घट होईल. क्षेत्र घटल्याने उसाची पळवापळवी व दराची स्पर्धा होणार असल्याचे चित्र तालुक्यात आहे.
त्याचा परिणाम एरवी पहिला हप्ता दोन हजारांच्या दरम्यान सांगणारे कारखानदार आता स्वतःहून दोन हजार ५०० रुपये प्रतिटनाला भाव जाहीर करू लागले आहेत. क्षेत्र व उत्पादनात घट होणार असल्याने साखर कारखान्यांना ऊस उपलब्धतेचा प्रश्न सतावणार आहे. साहजिकच यंदा गळीत हंगाम कारखान्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. गोदाकाठ परिसर हे उसाचे माहेरघर आहे.
निफाड तालुक्यात सरासरी ९ हजार एकरावर सुरू उसाचे क्षेत्र असते. निफाड तालुक्यात ५५० मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद होते. वरुणराजा यंदा रूसल्याने त्यात २० टक्के घट होऊन ४२५ मिलिमीटर पाऊस बरसला. त्याचा थेट परिणाम शेतीपिकावर झाला आहे.
पाण्याचे पीक म्हणून ओळख असलेल्या उसाच्या क्षेत्रात व उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यातून कारखान्यापुढे हंगाम पार पाडण्याची चिंता सतावणार आहे. गतवर्षी पर्यत ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखानदारांच्या विनवण्या कराव्या लागत होत्या.
ऊस तोडणीसाठी मुकादम यांनी एकरी पाच ते दहा हजार रुपये देण्याची वेळ शेतकऱ्यांवर होती. यंदा मात्र उलट चित्र दिसण्याची शक्यता आहे. ऊस देता का ऊस असे म्हणण्याची वेळ कारखान्यांवर येण्याची शक्यता आहे.
उसाची टंचाई भासणार
आमदार दिलीप बनकर यांच्या नेत्तृत्वाखालील रानवड साखर कारखान्याने दोन हजार ५०० रूपये टन भाव जाहीर केला. तर कादवा, द्वारकाधीश आणि नगर जिल्ह्यातील मधील अगस्ती (अकोले), संजीवनी (कोपरगाव), संगमनेर यांनीही जवळपास याच दरम्यान दर जाहीर केले आहे. क्षेत्र व वजन घटल्याने ऊस मिळविण्याची मोठी स्पर्धा कारखान्यामध्ये दिसणार आहे. वजन घटण्याची शक्यता असल्याने साखर उताराही घटणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.