
Solapur News : यंदाचा ऊस गाळप हंगाम माळशिर स तालुक्यातील साखर कारखान्यांना खडतर व आव्हानात्मक राहिला. चालू हंगामात तालुक्यातील पाच साखर कारखान्यांत आतापर्यंत २१ लाख एक हजार २३२ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन १९ लाख १८ हजार २५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तालुक्यातील तीन कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. उर्वरित दोन कारखान्यांचा हंगाम आठवडाभरात बंद होणार आहे.
तालुक्यात सहकारमहर्षी (अकलूज), सासवड माळी (माळीनगर), पांडुरंग (श्रीपूर), श्री शंकर (सदाशिवनगर), ओंकार शुगर (चांदापुरी) असे पाच साखर कारखाने आहेत. मागील हंगामात तालुक्यातील पाच साखर कारखान्यात २९ लाख पाच हजार ८६४ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन २८ लाख ३१ हजार २९५ क्विंटल साखर निर्माण झाले होते.
यंदाच्या हंगामात गतवर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याने तालुक्यातील कारखान्यांना उसाची चांगलीच चणचण जाणवली. अशात अपुऱ्या ऊसतोडणी, वाहतूक यंत्रणेमुळे कारखान्यांना पुरेशा प्रमाणात उसाचा पुरवठा होताना अडचणी निर्माण झाल्या.
अधिकचा ऊस दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस देण्याचा शेतकऱ्यांचा कल राहिल्याने ऊसदराचा परिणामही तालुक्यातील काही कारखान्यांच्या गाळप क्षमतेवर झाला. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील काही कारखान्यांनी तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेला. काही कारखान्यांना शेवटचे काही दिवस एखादी शिफ्ट बंद ठेवत ‘नो केन’ स्थितीत गाळप करावे लागले.
तालुक्यातील सहकार महर्षी, सासवड माळी व श्री शंकर या तीन कारखान्यांचा पट्टा पडला आहे. श्रीपूरचा पांडुरंग व चांदापुरीचा ओंकार शुगर हे कारखाने अद्याप सुरू आहेत. पांडुरंग कारखान्याचा गाळप हंगाम २० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तोपर्यंत आठ लाख टन गाळप पूर्ण होईल, अशी कारखाना व्यवस्थापनाला आशा आहे.
यावर्षी पांडुरंग कारखाना गाळपात जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर तर सरासरी साखर उताऱ्यात पहिल्या स्थानावर आहे. ओंकार शुगर कारखान्यातही आता ‘नो केन’ होऊ लागल्याने पुढील चार-पाच दिवसांत हा कारखाना बंद होईल, असे सांगण्यात आले.
एफआरपीपेक्षा जास्त दराची अपेक्षा
३१ जानेवारी २०२५ अखेरच्या साखर आयुक्तालयाच्या एफआरपी अहवालानुसार पांडुरंग कारखान्याने १३३ कोटी (१०० टक्के), सहकार महर्षी कारखान्याने ११८ कोटी (१०० टक्के), ओंकार शुगरने ६१ कोटी (१०० टक्के), श्री शंकर कारखान्याने ५२ कोटी (१०० टक्के) तर सासवड माळी कारखान्याने ४७ कोटी (८१ टक्के) रुपये एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे. तथापि, यंदा उसाचा तुटवडा असल्याने एफआरपीपेक्षा अधिकचा जाहीर केलेला ऊसदर मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
तालुक्यातील कारखान्यांचा ११ फेब्रुवारी अखेरचा गाळप अहवाल
पांडुरंग कारखाना :
गाळप- ७ लाख २२ हजार ९७२ मे.टन.
साखर - ६ लाख ७६ हजार ९२० क्विंटल
उतारा- ११ टक्के.
सहकार महर्षी कारखाना
गाळप - ५ लाख ५४ हजार १५मे.टन.
साखर - ५ लाख २४ हजार ७५० क्विंटल,
उतारा- ९.५ टक्के.
ओंकार शुगर :
गाळप- ३ लाख २९ हजार १८मे.टन.
साखर- ३ लाख एक हजार ४३५ क्विंटल.
उतारा- ९.२६ टक्के
सासवड माळी :
गाळप- २ लाख ७५ हजार ६४मे.टन.
साखर- २ लाख ३६ हजार ८०० क्विंटल
उतारा- १०.०७ टक्के
श्री शंकर कारखाना :
गाळप- २ लाख १९ हजार २८मे.टन.
साखर- १ लाख ७८ हजार ३५० क्विंटल
उतारा- ८.२९ टक्के
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.