
Kolhapur News : देशात गळीत हंगामाची स्थिती मंदावलेली असताना साखरेचे दरही गेल्या दीड वर्षात नीचांकी पातळीवर आल्याने आता साखर कारखान्यांपुढे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात साखरेच्या किमतीत क्विंटलला तब्बल तीनशे रुपयांनी घट झाली आहे. सध्या साखरेच्या किमती ३३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरल्या आहेत.
जून २०२३ ला साखरेचा दर ३३०० रुपयापर्यंत खाली आला होता. यानंतर यंदाच्या डिसेंबरला दरात ३३०० रुपयापर्यंत घसरण झाली आहे. सणासुदीचे दिवस संपल्याने आता साखरेला विशेष मागणी नाही. त्यातच देशभरात थंडी सुरू असल्याने शीतपेय व तत्सम उद्योगातून माफक मागणी असल्याने अनेक कारखान्यांपुढे दिलेला साखर कोटा संपविण्याचा दबाव आहे.
सध्या ऊस हंगाम सुरू असून, ऊस तोडणीनंतर पंधरा दिवसांमध्ये ‘एफआरपी’ देण्याचा केंद्राचा नियम असल्याने आता कारखानदारांच्या अडचणी वाढत असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. दिवाळीनंतर सुरू असणारी साखर दराची घसरण कायम आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला गरजेपेक्षा जास्त साखर शिल्लक होती. यामुळे साखर कमी पडेल असा अंदाज नसल्याने साखरेची खरेदी वेगात झाली नाही.
साखर कारखाना प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेकडून बाजारातील ३४०० साखर दर गृहीत धरून साखर तारणावर ८५ ते ९० टक्के उचल दिली जाते. त्यातून मागील कर्जाचे टॅगिंग ५०० ते ७०० व उत्पादन खर्च २५० रुपये अशी वजावट करून उचल दिली जाते. ऊस तेाडणी, ओढणी खर्च ८५० प्रति टन इतका येत आहे.
या सर्व बाबींचा विचार केल्यास कारखान्यांना उत्पन्नापेक्षा कारखानानिहाय ७०० ते ९०० प्रती टन जादा उत्पादकांना द्यावे लागत आहे. साखर कारखान्यांच्या एकूण उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न हे साखर विक्रीतून मिळते व उर्वरित २० टक्के उत्पन्न हे उपपदार्थापासून मिळत असते. यापैकी २० टक्के उपपदार्थांच्या विक्रीतून मिळणारा नफा हा ८० टक्के साखर विक्रीतून होणारा तोटा भरून निघत नाही.
यामुळे दिवसेंदिवस कारखान्यांचे तोटे वाढून कारखान्यांची खाती एनपीएमध्ये जाऊ लागली आहेत. परिणामी, कारखान्यांना पतपुरवठा होण्यामध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. याचा फटका सहकारी व खासगी साखर कारखान्यांनाही बसत आहे. साखर आयुक्तालयाकडून १८६ कारखान्यांना गाळप परवाने देऊनही उद्याप ४० ते ४५ कारखाने आर्थिक अडचणींमुळे सुरू झालेले नाहीत. सर्वच साखर कारखान्यांकडे उप पदार्थनिर्मिती प्रकल्प आहेत, अशी वस्तुस्थिती नसल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.
उद्योगाची अडचण
सध्याची परिस्थिती पाहता साखरेच्या ‘एमएसपी’मध्ये व इथेनॉलच्या किमतीत वाढ करणे अपरिहार्य बनल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत जर हे निर्णय झाले नाहीत तर बहुतांशी कारखान्यांना यंदाची ‘एफआरपी’ वेळेत देण्यात अडचण निर्माण होऊ शकते, अशी भीती साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.
सुरुवातीच्या काळात केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठविली यानंतर चांगले निर्णय केंद्राकडून होतील असे वाटत असताना हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेल्यानंतरही केंद्राने कोणतेच सकारात्मक निर्णय घेतले नसल्याने उद्योगाची अडचण वाढली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.