
मूळचे नगर जिल्ह्यातील नेवासा (Nevasa) येथील नंदकिशोर पुंड (Nandkishor Pund) यांनी कृषी विभागात (Agril. Department) मराठवाड्यात २० वर्षे आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात अशी जवळपास ३६ वर्षे सेवा केली. सन २०१५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. मुलगा आयुर्वेदिक डॉक्टर असून, त्याचा जालना येथेच व्यवसाय आहे.
साहजिकच उद्योगाचं शहर म्हणून ओळख असलेल्या या जालना शहरातील भाग्यनगर भागात पुंड स्थायिक झाले. सेवानिवृत्तीनंतर देखील स्वस्थ न बसता त्यांनी आपल्या घराच्या परसबागेत तसेच छतावर ‘टेरेस गार्डनिंग’ सुरू केले. त्यात २५० हून अधिक प्रकारच्या झाडांची लागवड केली आहे. यामध्ये फळे, भाजीपाला, मसाला पिके, शोभीवंत झाडे, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. या प्रयोगातून संपूर्ण घर परिसर समृद्ध झाला आहे.
आवळा प्रक्रियेतच छंद जडला
सुमारे चार वर्षांपूर्वी खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षणात सहभागी झाल्यानंतर पुंड यांना आवळा प्रक्रिया उद्योगाबाबत आवड निर्माण झाली. व्हिटॅमिन ‘सी’युक्त व आरोग्यदायी आवळ्यापासून कॅण्डी व सरबत तयार करता येईल का याची चाचपणी सुरू केली.
व्यावसायिक स्तरावर न जाता घरगुती स्तरावरच प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. त्यासाठी आवश्यक कच्चा माल (आवळा) थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरेदी केला जातो. त्यासाठी प्रति किलो २० रुपये तर जे शेतकरी घरी माल पोहोचता करतील
त्यांना २५ रुपये दर देण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी ५० किलो, दुसऱ्या वर्षी दोन क्विंटल, तिसऱ्या वर्षी चार, तर यंदा तीन क्विंटल आवळ्यांपासून कॅण्डी व उर्वरित सरबत तयार केले आहे. या सर्व कामात पत्नीसह कुटुंबातील अन्य सदस्यांचीही मदत होते.
घरगुती स्तरावर उत्पादन
दर आठवड्याला सुमारे ४० किलो आवळ्याची गरज भासते. साधारण एक बॅच १५ किलोची असते. निर्मितीची पध्दत वेळ लागणारी मात्र व अत्यंत साधी, सोपी अशी आहे. साधारण १५ किलो आवळा स्वच्छ धुतला जातो.
त्यानंतर पिशव्यांमध्ये भरून फ्रीजरमध्ये तीन दिवस ठेवला जातो. चौथ्या दिवशी आवळे बाहेर काढल्यानंतर दुपारनंतर त्याच्या पाकळ्या हाताने काढल्या जातात. दोन ते तीन किलो बिया आणि साल गेल्यानंतर १२ किलोपर्यंत पाकळ्या मिळतात. त्यांचे दोन समान भाग करून दोन पातेल्यांमध्ये प्रत्येकी सहा किलो त्या टाकल्या जातात.
त्यासाठी पाच किलो साखर ही तीन दिवस २ किलो, २ किलो व एक ते अर्धा किलो अशी विभागून दिली जाते. अर्धा चमचा दालचिनी, अर्धा चमचा वेलची, एक चमचा सैंधव मीठ व एक चमचा काळे मीठ त्यात मिसळले जाते. तीन दिवसांनी पातेल्यातील तयार झालेल्या पाकातून पाकळ्या बाहेर काढल्या जातात.
१२ किलो पाकळ्या अशाप्रकारे मुरविल्यानंतर त्यापासून अडीच ते तीन लिटर सरबत उपलब्ध होते. पाकळ्या स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात स्वच्छ कापडावर सुकविल्या जातात. त्यानंतर पाव, अर्धा व एक किलो वजनी पॅकिंग करून ४०० रुपये प्रति किलो दराने विकली जाते. आवळा हंगाम हा सप्टेंबरपासून ते जानेवारी-फेब्रुवारीपर्यंतच चालतो.
पुंड यांनी सोशल मीडियाच्या आधारे अडीचशेपर्यंत ग्राहक तयार केले आहेत. यात डॉक्टर, प्राध्यापक, कृषी विभागातील अधिकारी आदींचा समावेश आहे. त्यामुळे विक्रीची समस्या सतावत नाही. ‘ॲमॅझॉन’वरही उत्पादन उपलब्ध केले आहे.
नंदकिशोर पुंड ९४२२२२९०५१
संतोष मुंढे
कृषी विभागातून सेवानिवृत्त झालेल्या नंदकिशोर सखाराम पुंड यांनी घराच्या छतावर भाजीपाला, फळे, फुलांचे समृद्ध टेरेस गार्डन साकारले. घरगुती स्तरावर आवळा कॅण्डी, सरबत तसेच पॅशन फ्रूट फळापासून ‘ज्यूस’ तयार करून त्याची स्थानिक स्तरावर विक्री सुरू केली आहे. प्रक्रिया व्यवसायातून अर्थार्जनाचा त्यांनी दाखविलेला मार्ग प्रेरणादायीच आहे.
पॅशन फ्रूटचा ज्यूस
पॅशन फ्रूटचे चार वेल परसबागेत लावले आहेत. या वेलींना हंगामात सुमारे दीडशे ते त्याहून फळे लगडतात. अर्थात ती टप्प्याटप्प्याने येत असतात. ती त्या त्या वेळी काढून त्यापासून ज्यूस तयार केला जातो.
प्रति बारा फळांसाठी तीन लिटर पाण्याचा वापर केला जातो. घरी वापर करण्यासोबतच मागणीनुसार पुंड यांनी त्याची विक्रीही सुरू केली आहे. घरी येणाऱ्या प्रत्येकाला चहा, कॉफी ऐवजी या फळाचा ज्यूस किंवा आवळा सरबत देण्यात येते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.