
Sindhudurg News : सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पात्र ठरलेल्या ४ हजार १९६ शेतकऱ्यांच्या खात्यात काजू अनुदान रक्कम जमा होण्यास बुधवारपासून (ता. ९) सुरुवात झाली आहे. तीन जिल्ह्यांतील ४ हजार १९६ उत्पादकांच्या बँक खात्यात ४ कोटी ९७ लाख ४ हजार ६११ रुपये जमा होणार आहेत.
बदलत्या वातावरणाचा मोठा फटका गेल्या वर्षी काजू बागायतदारांना बसला. एकीकडे उत्पादन कमी असताना काजू बीचा दर प्रति किलो १२० रुपयांपर्यंत घसरला. त्यामुळे काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडले.
या विषयावरून सिंधुदुर्ग फळबागायतदार संघाने काजू बीचा दर प्रतिकिलो २०० रुपये करावा, गोव्याच्या धर्तीवर शासनाने हमीभाव निश्चित करून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी करीत अनेक आंदोलने केली.
त्यामुळे राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादकांसाठी १० कोटी अनुदान जाहीर केले. त्याकरिता जास्तीत २००० हजार किलोपर्यंत आणि जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंत हे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र या योजनेत अनेक जाचक अटींचा समावेश होता. जीएसटी पावतीसह अनेक निकष होते. त्यामुळे काजू उत्पादकांनी पुन्हा आंदोलन केले. त्यानंतर काजू बोर्डाने काही अटी कमी केल्या.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून एकूण ५ हजार १५८ अर्ज काजू बोर्डाकडे प्राप्त झाले. त्यापैकी ४ हजार १९६ अर्ज वैद्य ठरले. उर्वरित ९८९ अर्ज पूर्ततेकरिता पुन्हा पाठविण्यात आले.
सिंधुदुर्गातील २ हजार २० शेतकऱ्यांना २ कोटी ३४ लाख १३ हजार रुपये, रत्नागिरीतील ४८० काजू उत्पादकांना ७१ लाख ७६ हजार रुपये, तर कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार ६९६ शेतकऱ्यांना १ कोटी ९१ लाख ५ हजार ७११ रुपये मंजूर झाले. हे अनुदान वितरण करण्याची प्रकिया बुधवारपासून सुरू झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.