Dahanu News : धामणी व कवडास धरणांतील कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यावर कासा परिसरातील शेकडो शेतकरी उन्हाळी भात शेती, तसेच भाजीपाल्याची लागवड करतात. डहाणू तालुक्यातील पूर्वेकडील शेतकरी वर्ग कालव्याच्या पाण्याचा फायदा घेत उदरनिर्वाहासाठी उत्पादन घेतो. सध्या उन्हाळी भात लावणीला वेग आला आहे.
कासा परिसरातील ननिवली, पेठ, आंबेदे, चारोटी, सारणी, घोळ, भराड, रानशेत, वधना, पिंपळशेत, म्हसाड, ऊर्से, सोनाळे, तवा या भागातील शेतकरी उन्हाळी भातशेती लागवडीच्या कामात व्यग्र आहेत. कासा, वाणगाव कृषी मंडळांतर्गत ८८०.०९ हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी
हातभार लागतो. सूर्या कालव्याशेजारील हजारो शेतकरी उन्हाळी शेती करतात. तसेच सूर्या नदीवर जवळपास पाच ठिकाणी कोकण पद्धतीचे बंधारे बांधले आहे. ज्या भागांमध्ये कालव्याचे पाणी पोहोचत नाही, त्यांना सूर्याच्या कालव्याच्या पाण्याचा उपयोग होतो. यासाठी तालुका कृषी अधिकारी मार्गदर्शन करतात. या वर्षी कालव्यातून उशिरा पाणी सोडल्याने लागवडदेखील उशिरा झाली.
संकटाचे आव्हान
पावसाळ्यात भातशेती करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण उन्हाळ्यातील शेती करताना रोगराई, तसेच अतिवृष्टी, पूर याचा सामना करावा लागत नाही. उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. भात पीकदेखील चांगले येते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे उन्हाळी शेतीसाठी भात लावणीच्या कामात शेतकरी व्यग्र असल्याचे चित्र आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.