
डॉ. सूर्यकांत पवार, रामेश्वर ठोंबरे
Vasantrao Naik Agricultural University: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणी येथे १८ मे १९७२ रोजी झाली. त्या वेळी मराठवाडा कृषी विद्यापीठ असे नाव होते. पुढे १ जुलै २०१३ रोजी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच सोबत अजिंठा-वेरूळ ही जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेली ठिकाणे याच भूमीत आहेत. गोदावरी नदीवर झालेले नाथसागर ही एक मोठी जलशक्ती याच भूमीत आहे.
राज्यात विभागवार चार कृषी विद्यापीठे आहेत. मराठवाड्यातील शेतीसाठी सुयोग्य कृषी तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम परभणीत विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून सुरू आहे. शेतीचे प्रश्न मोठे आहेत. त्यात हा विभाग कोरडवाहू आणि तुकड्याची शेती झाल्याने विद्यापीठासमोर आव्हान नक्कीच आहेच. पण यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम विद्यापीठ सातत्याने करत आहे
संशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठाची प्रगती चांगली आहे. कदाचित ती सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचलेली नसेल. पण आजचे युग हे माहिती तंत्रज्ञान असल्याने झपाट्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य आहे. विद्यापीठाने या आधुनिक कृषी विस्तार सेवेचा चांगला उपयोग सुरू केला आहे.
कृषी विस्तार सेवेचे मागील दशक विशेष ठरले. विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावर, उमेद , माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी ही नैमित्तिक कृषी विस्तार सेवा शेतकऱ्यांना बल देणारी ठरली. शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान झपाट्याने पोहोचत आहे. विद्यापीठ निर्मित विविध उत्पादनांची विक्री नुसती परभणी पुरती सीमित न राहता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी ते उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकरी विद्यापीठाशी थेट जोडले गेले आहेत.
आजवर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष कीड, रोग नियंत्रण मोहीम, फळबागा वाचवा अभियान अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या मदतीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शास्त्रज्ञ पोहोचले. शेतकरी- शास्त्रज्ञ संवाद घडला गेला. शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात बचत होणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शेतकरी अभिमुख सेवा देण्यात येत आहे. जैविक बुरशीनाशके, जैविक खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. त्यात बायोमिक्स हे नाव शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे
कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, ज्वारी, करडी, जवस या पिकांसोबत या भूमीतील फळझाडांचा सखोल अभ्यास करता मोसंबी, डाळिंब, पेरू, सीताफळ आदी फळपिकांचे उत्पादन लागवड तंत्रज्ञान विकसित करून मराठवाड्यातील शेतीत बहरत आहे. फळे व इतर पिकांचे नव-नवीन वाण विकसित करण्यात विद्यापीठाने मोठी मजल मारली आहे. शेतीला पशू व्यवसायाची जोड असावी यासाठी पशू संगोपनाकरिता एकेका विभागातील जातिवंत गोधन कसे अधिक विकसित करता येईल यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत
कापूस संशोधन केंद्र, ज्वारी संशोधन केंद्र, कृषी संशोधन केंद्र, तेलबिया संशोधन केंद्र, फळ संशोधन केंद्र ही विद्यापीठाची शेतकऱ्यासाठी शक्ती स्थळे आहेत. या केंद्रांतून विकसित झालेल्या वाणांचे महत्त्व विभागापुरते मर्यादित नसून ते राज्यभर आणि देशपातळीवर सिद्ध झाले आहे अशा या वसंताचा आज वर्धापन दिन आहे. या वसंताचा परिवार मोठा आहे. कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्तार या तिन्ही आघाड्यांवर विद्यापीठाने आपला ठसा उमटवला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात...
तरी अवचित आली माधवी
ते हेतू होय नवपल्लवी
पल्लव पुष्प पुंज दावी
पुष्प फळाते
- वसंत ऋतू आल्यावर तो जसा सृष्टीतील फुला फळांना बहर आणतो, झाडांना नवीन फुले येतात, त्या फुलापासून फळ निर्मिती होते, त्याचे शेतकऱ्यांना एक समाधान असते.शेवटी वसंत ओवीने सांगता...
यया माजी मी ऐसा
वणी का वसंतू जैसा
वनक्ष्मी विलासा
हेतुभूत
तसे काम या भूमीसाठी या वसंताने केले आहे.
(लेखक विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.