
परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे (Vasantrao Naik Agriculture University) संपूर्ण मराठवाड्यामध्ये १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ (Maza Ek Divas Balirajasathi) उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत मंगळवारी (ता. ८) विद्यापीठ शास्त्रज्ञ मराठवाड्यातील ५० पेक्षा जास्त गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
त्यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञांची २५ पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यात १०० पेक्षा शास्त्रज्ञांचा समावेश आहे. संपूर्ण दिवसात विद्यापीठातील शास्त्रज्ञ शेतावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कृषी विषयक समस्या जाणून घेणार आहेत.विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमांतर्गत कुलगुरू डॉ.इंद्र मणी मंगरूळ (ता.मानवत) येथे शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन संवाद साधणार आहेत.‘
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रे,संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आदी ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. विविध शेती विषयक विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमांची सुरवात १ सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यादिवशी संपूर्ण मराठवाड्यामध्ये विद्यापीठाच्या ८० शास्त्रज्ञांच्या २२ पथकांनी ६० गावांमध्ये जाऊन तर ३ ऑक्टोबर रोजी ११५ शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या २७ पथकांनी ६४ गावांत भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांच्या शेती विषयक तांत्रिक समस्यांचे समाधान करण्यात आले. कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांची पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती डॉ. देवसरकर यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.