
Rural Economy : सांगली जिल्ह्यातील जत तालुका आपली दुष्काळी ओळख पुसण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आहे. आटोकाट प्रयत्न करून पाण्याची उपलब्धता करून जिद्दीने लढत इथला शेतकरी शेती फुलवतो आहे. तालुक्यातील जत - उमदी राज्यमार्गावर अडीच ते तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेलं कोळगिरी गाव वसलं आहे. वरुणराजाच्या कृपेवर इथल्या खरीप व रब्बी हंगामाची भिस्त असते.
भौगोलिक क्षेत्र १६७९ हेक्टर असून, पैकी खरीप ४१६ हेक्टर तर रब्बीचे क्षेत्र ११८८ हेक्टरपर्यंत आहे. ज्वारी या मुख्य पिकासह तूर, मूग, उडीद, मका, कांदा आदी पिकेही शेतकरी घेतात. पिण्यासह शेतीसाठीही शाश्वत पाण्याची सुविधा नाही. शेतकऱ्यांनी विहिरी, कूपनलिका घेतल्या. परंतु बागायती क्षेत्र आणि फळबागा लागवड कमीच आहे. अनेक कुटुंबे मोलमजुरी करतात. तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधील कुटुंबे दरवर्षी सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत ऊस तोडणीसाठी जातात.
ज्वारी पिकावर संपूर्ण भिस्त
ज्वारी हे कोळगिरी गावचे खात्रीचा उदरनिर्वाहाचे मुख्य पीक आहे. अलीकडील चार वर्षांतील रब्बी ज्वारीचे क्षेत्र पुढीलप्रमाणो आहे.
वर्ष क्षेत्र (हेक्टर)
२०२१-२२ ९८६
२०२२-२३ ९१०
२०२३-२४ ९४०
२०२४-२५ १००५
गावातील भीमण्णा कांबळे, शरद जाहीर, वसंत कांबळे हे अनुभवी शेतकरी त्याबाबत अनुभव विषद करताना म्हणतात, की आमच्या वाट्याला दुष्काळ कायमच आला आहे. शेती फुलविण्याची इच्छा असूनही मर्यादा येतात. रब्बी हंगामातील ज्वारी हेच आमचं प्रमुख पीक. दुष्काळ असो वा अतिपाऊस, वाड-वडिलांच्या काळापासून या पिकाची परंपरा आम्ही गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. या भागात परतीचा पाऊस पडतो. त्याच्या भरवशावर हे पीक येतं.
लागवडीतील बाबी
सुचित्रा, वसुधा, मालदांडी आदी वाण शेतकरी घेतात. एक एकरापासून ते दहा एकरांपर्यंत ज्वारी घेणारे शेतकरी गावात आहेत. अर्थात, पावसाच्या प्रमाणानुसार क्षेत्र अवलंबून असतं. उपलब्धतेनुसार किंवा वर्षातून एकदा तीन ट्रेलर शेणखताचा वापर होतो. बहुतांश शेतकरी यंत्राद्वारे व सप्टेंबरच्या मध्यापासून पेरणी करतात. उत्पादन वाढीसाठी काही शेतकऱ्यांनी व्यवस्थापनात सुधारणा केल्या आहेत. दोन ओळींतील अंतर १२ इंचांवरून १६ इंच, तर दोन रोपांतील अंतर अडीच इंचावरून तीन ते चार इंचठेवले आहे. अंतर वाढविल्याने हवा खेळती राहण्यास मदत झाली आहे. ज्वारीच्या धाटाची जाडी वाढते.कणसाचा आकार मोठा होण्यास मदत होते. दोन वेळा कोळपणी केल्याने पिकाची वाढ चांगली होते.
उत्पादन व विक्री व्यवस्था
पावसावर येणारे पीक असल्याने उत्पादन खर्च एकरी सुमारे १५ ते १६ हजारांपर्यंत, तर उत्पादन ७ ते ९ क्विंटलपर्यंत मिळते. घरी वर्षभर पुरेल एवढी ठेऊन उर्वरित ज्वारीची जत बाजार समितीत विक्री होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे दुय्यम बाजार आवार आहे. उडीद, ज्वारी, मूग विक्रीसाठी तालुक्यातील शेतकरी येथे येतात. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची ही हक्काची बाजारपेठ आहे. काही व्यापारी बांधावरही ज्वारी खरेदीला येतात. गावातील कुटुंबे ऊस तोडणीसाठी सांगली, कोल्हापूरसह अनेक भागात जात असल्याने त्यांची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या वाहन चालक - मालकांकडूनही ज्वारीची खरेदी होते.
जत बाजार समितीत दोन वर्षापूर्वी ज्वारीला प्रति क्विंटल दर चार हजार, मागील वर्षी ६५०० तर यंदा २६०० रुपये दर आहे. यंदा पाऊस चांगला झाला असल्याने पेरा व त्याचबरोबर उत्पादनही वाढेल असा अंदाज व्यापारी शिवकुमार बेळुंकी व्यक्त करतात. यंदा दर जेमतेम असल्याने शेतकरी एकूण परिस्थिती पाहूनच विक्रीचे नियोजन करतील अशी शक्यता आहे.
कडबा विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न : धान्यासोबत ज्वारीचा कडबाही मुबलक म्हणजे एकरी १२०० ते १५०० पेंढ्यांपर्यंत मिळतो. गावातील २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. त्यामुळे घरच्या जनावरांपुरता ठेवून उर्वरित कडब्याची अडीच हजार रुपये प्रति शेकडा दराने विक्री होते. त्यातून उत्पादन खर्च कमी होतो.
ज्वारी उत्पादकांचे अनुभव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.