
डॉ. आदिनाथ ताकटे
Intercultural Operation : जमिनीतील ओलावा हा पावसावर प्रमाणावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. पडणाऱ्या एकूण पावसापैकी १० ते २० टक्के पाणी जमिनीवरून वाहून जाते. बाकीच्या पाण्यापैकी १० टक्के पाणी निचऱ्याद्वारे, तर ६० ते ७० टक्के बाष्पीभवनाद्वारे निघून जाते. त्यामुळे जमिनीत केवळ १० टक्के पाणी उपलब्ध राहते. त्यासाठी पावसाचे वाहून जाणारे पाणी, निचऱ्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी जास्तीत जास्त साठवून त्याचा पीक उत्पादनासाठी फायदा करून अत्यंत आवश्यक आहे.
कोरडवाहू शेतीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. याच अनुषंगाने कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर येथे अभ्यास करून काही महत्त्वाच्या तंत्राचा शेतीमध्ये अवलंब करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बांधबंदिस्ती, आंतरबांध व्यवस्थापन, उतारास आडवी मशागत करणे, कोळपणी करणे, आच्छादनाचा वापर, शेततळी, जैविक बांध या सारख्या उपायांवर भर देण्यात आला.
जमिनीत ओल टिकवून ठेवण्याच्या उपायाआधी जमिनीतील ओल कशी कमी होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. जमिनीत साठवून राहिलेली ओल पिकांनी वापरणे, पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाणे, भेगा पडल्यामुळे त्यातून बाष्पीभवन होणे, तणांवाटे ओल नष्ट होणे या चार मार्गांनी जमिनीतील ओल कमी होते. त्यातील पिकाच्या प्रत्यक्ष वाढीसाठी अतिशय कमी प्रमाणात ओल लागते. बहुतांशी (सुमारे ६० टक्के) ओल ही बाष्पीभवनामुळे उडून जाते. त्यासाठी वरील उपायांचा अवलंब केल्यास कमी होणाऱ्या ओलीचा बंदोबस्त करणे शक्य होते.
एक कोळपणी आणि अर्धे पाणी
पीक वाढताना त्यासोबत शेतात तणही वाढत असते. हे तण पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश यासाठी मुख्य पिकांसोबत स्पर्धा करते. पीक उगवून आल्यावर त्यात ठराविक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवण्यासाठी होतो. तणांच्या प्रादुर्भावामुळे कमी होणारी ओल, तणांचा बंदोबस्त केल्याने टिकवून ठेवली जाते. याशिवाय कोळपणी केल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो. त्यामुळे उडून जाणारी ओल थोपविता येते. यामुळे ओल टिकवून धरण्यामध्ये ‘कोळपणी’चा फार मोठा वाटा आहे.
रब्बी हंगामात कोळपणी अत्यंत महत्त्वाचा भूमिका बजावते. एकदा कोळपणी केली, तर जवळपास एक पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. या तत्त्वाचा अवलंब करून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारीकरिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाल्यानंतर फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे शेतात वाढणारे तण नष्ट होऊन पाण्याचा होणारा अपव्यय टाळता येतो.
दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्यांचे झाल्यानंतर, पासेच्या कोळप्याने करावी. त्या वेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडण्यास सुरुवात झालेली असते. या कोळपणीमुळे या भेगा बुजण्यास मदत होते. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंदावते.
तिसरी कोळपणी पीक आठ आठवड्यांचे झाल्यानंतर करावी. या कोळपणीसाठी दातेरी कोळपे वापरण्याची शिफारस आहे. या काळात जमीन टणक झाली असल्याने फासाचे कोळपे व्यवस्थित चालत नाही. तिसऱ्या कोळपणीसाठी दातेरी कोळपे वापरल्यास ते मातीत व्यवस्थित घुसून माती मोकळी होऊन भेगा बुजविल्या जातात. जमिनीत ओल फार कमी असेल, त्यावेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास फायदेशीर ठरते.
कोरडवाहू रब्बी ज्वारी तयार होण्यास साधारणपणे १८० पासून २८० मि.मी. ओल आवश्यक असते. त्यापैकी ४० टक्के ओल पीक फुलोऱ्यात येण्यापासून तयार होण्याच्या अवस्थेत लागते. त्यामुळे पुरेशी ओल उपलब्ध होण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे.
आंतरमशागतीसाठी खुरपणीदेखील अपेक्षित आहे. परंतु सुरुवातीच्या काळात जमीन मऊ असताना आणि तण वाढत आहे, त्या वेळी या खुरपणीचा लाभ होतो. बैलचलित कोळपे चालविण्याने खोलवर मशागत करता येते. जमीन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो. आंतरमशागत करताना काही प्रमाणात विरळणी देखील करता येईल. मर्यादेपेक्षा जास्त असलेली रोपे काढून टाकणे हा ओलावा टिकविण्याचा एक उपाय आहे.
कोळपणीचे वेळापत्रक
पहिली कोळपणी तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने
दुसरी कोळपणी पाचव्या आठवड्यात पासेच्या कोळप्याने
तिसरी कोळपणी आठव्या आठवड्यात दातेरी कोळप्याने
पाणी व्यवस्थापन
ज्वारी हे कोरडवाहू पीक म्हणून ओळखले जाते. पीक तयार होण्यासाठी ११० ते १२० दिवस लागत असल्याने मोठया प्रमाणात धान्य व कडब्याचे उत्पादन घेण्यासाठी या पिकाला पाण्याची गरज असते. बागायती ज्वारी पिकास एकूण दिलेल्या पाण्यापैकी ७० टक्के पाणी जमिनीच्या पहिल्या ३० सें.मी. थरातून, १६ टक्के पाणी दुसऱ्या थरातून, ९ टक्के पाणी तिसऱ्या थरातून, तर उरलेले ५ टक्के पाणी चौथ्या थरातून पीक घेत असते. पहिल्या ३० सें.मी. थरात ६० टक्क्यांपेक्षा जास्त मुळे असल्याने या थरातून पिकाची पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भागवली जाते. बागायती रब्बी ज्वारीस पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते. मात्र भारी, काळ्या खोल जमिनीत पहिल्या तीन अवस्थेतच पाणी द्यावे.
कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना ५० ते ५५ दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.
बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी आणि कणसात दाणे भरताना ९० ते ९५ दिवसांनी द्यावे.
भारी जमिनीत ज्वारीला चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.
बागायती रब्बी ज्वारीस पाणी देण्याच्या अवस्था
ज्वारी पिकाचा जोमदार वाढीचा काळ पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी
पीक पोटरीत असताना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी
पीक फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी
कणसात दाणे भरण्याचा काळ पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.