Soil Fertility
Soil FertilityAgrowon

Agriculture Soil Health : जमीन सुपीकतेसाठी उपाययोजना

Soil Fertility : मातीचे संरक्षण व संवर्धन करणे ही मूलभूत गरज आहे. जमिनीच्या पृष्ठभागावरील १५ सेंमी जाडीचा थर हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्या थरातच पिकास आवश्यक अशी अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात असतात

डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. मदन पेंडके

Conservation of Soil : मातीचे संरक्षण व संवर्धन करणे ही मूलभूत गरज आहे. जमिनीच्या पृष्ठभागावरील १५ सेंमी जाडीचा थर हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्या थरातच पिकास आवश्यक अशी अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात असतात.

जोराचा पाऊस पडला की पाण्याबरोबर माती वाहून जाते. पावसाने होणारी धूप थांबविण्याच्या दृष्टीने बांधबंदिस्ती करणे आवश्यक आहे. मध्यम खोल व उथळ जमिनीसाठी समपातळीत बांध घातले असता जमिनीची धूप थांबवून बांधामध्ये पाणी मुरण्यास भरपूर वेळ मिळतो. त्यामुळे ओल टिकवली जाते. धूप थांबते. भारी व काळ्या जमिनीत मृद संधारणाबरोबरच आवश्यकतेपेक्षा जास्त असलेल्या पाण्याचा निचरा आवश्यक असते.

Soil Fertility
Soil and Water Conservation : पाणीटंचाईग्रस्त ‘लाठ खुर्द’ने घडविली किमया

आच्छादनाचा वापर

जमिनीत ओल थोपवून ठेवण्यासाठी आच्छादन फारच फायदेशीर आहे. जमिनीची धूप मुख्यत: पावसाच्या पाण्यामुळे सुटणाऱ्या मातीच्या कणांमुळे होते. ज्या जमिनी खोल असतात, खरीपामध्ये पडीत ठेवून रब्बी हंगामात पीक घेतात, अशा जमिनीवर धूपसंरक्षक उपाय म्हणून आच्छादनाचा वापर अतिशय उपयुक्त ठरतो.

आच्छादनामुळे जमिनीची धूप ९० टक्क्यांनी कमी होते. पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत मुरण्याची क्रिया सुरू होते. विशेषत: उन्हाळ्यात दिवसात त्याचा चांगला उपयोग होतो.

आच्छादनापासून पिकाच्या वाढीसाठी जमिनीत ओलावा उपलब्ध होऊन त्यामुळे रासायनिक खताचा वापर जास्त प्रमाणात करता येतो. रासायनिक खताची उपयोग क्षमता वाढते.

आच्छादनामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. आच्छादनासाठी प्रामुख्याने ज्वारीचे सड, तुराट्या, वाळलेले गवत, प­ऱ्हाट्या, गव्हाचे काड, साळीचा पेंढा, ऊस पाचट, लाकडाचा भुसा, झाडाची वाळलेली पाने, काडीकचरा पसरावा.

ओलावा साठवण्याचे उपाय

जमिनीत पाणी मुरवण्याचे प्रमाण वाढवणे, बाष्पीभवन कमी करणे महत्त्वाचे असते. पावसाचे मिळणारे सर्वच पाणी शेतीला उपयुक्त होते असे नाही. जमिनीच्या उताराचे प्रमाण व पृष्ठभागाच्या परिस्थितीप्रमाणे पावसाचे पाणी कमी-अधिक वाहून जाते.

एकूण पडणाऱ्या पावसाच्या फक्त ६५ ते ७५ टक्के पाऊस पिकाच्या वाढीच्यादृष्टीने उपयुक्त असते. हे वाहून जाणारे पाणी शेतात खोलगट भागात बांध घालून रोखता येईल. त्यासाठी नैसर्गिकरित्या खोलगट भागाची निवड करावी. बांधाची लांबी आणि उंची कमी करून खड्ड्यात पाणी साठवण्याची क्षमता वाढवावी. अशी तळी बांधण्यास योग्य जागा नसल्यास, खोदीव तळे तयार करावे. त्यासाठी बांधाच्या सांडव्याच्या खाली किंवा नाल्याच्या कडेला मोठे खड्डे काढून, वाहून जाणारे पाणी साठवावे. हे ज्या वेळी पिकास पाण्याची गरज आहे त्यावेळी त्याचा वापर करावा.

Soil Fertility
Saline Soil Management : क्षारपड जमिनीचे व्यवस्थापन

पेरणी आणि मशागत

चिकण मातीच्या जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे पृष्ठभागावरील पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. पाणी मुरवण्याच्या किंवा वाढवण्याच्यादृष्टीने जमिनीची खोल नांगरट करून घेणे आवश्यक आहे.

नांगरट उतारास आडवी केल्यास फायदेशीर ठरते. नांगरटीनंतर पेरण्यास योग्य जमीन करण्यासाठी कुळवणी आवश्यक आहे. कुळव्याच्या पाळ्या ३ ते ४ द्याव्यात. त्यामुळे पावसानंतर उगवणारे लहान तण नष्ट होते. कुळवाच्या पाळीने जमिनीतून वाफेच्या रूपाने जाणारे पाणी कमी होते. कोरडवाहू क्षेत्रात पिकांची निवड करताना विशेष काळजी घ्यावी.

सर्वसाधारणपणे ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. परिणामी जमिनीची धूपही वाढते. म्हणूनच या काळात संपूर्ण जमीन झाकून टाकणारी पिके जास्त उपयुक्त ठरतात. अशी पिके पावसाच्या पाण्यापासून जमिनीचे संरक्षण करतात. शिवाय जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्यास अडथळा करतात.

त्यादृष्टीने भुईमूग, बाजरी, मटकी, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांची निवड करावी. त्याशिवाय पिकांच्या वाढीस लागणारा काळ लक्षात घ्यावा. अल्पमुदतीच्या पिकांची वाढ झपाट्याने होते. त्यांना पाण्याची गरज फारच कमी असते, म्हणून अल्प मुदतीची पिके निवडण्यास काहीही हरकत नाही. त्याचबरोबर कोरडवाहू जमिनीत लवकर पेरणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पेरणीनंतर पिकास अधूनमधून कोळपणी करावी. म्हणजे ओलावा जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. शिवाय कोळपणीमुळे जमिनीत पडलेल्या भेगा मोडल्या जाऊन हवेत निघून जाणा­ऱ्या वाफरूपी पाण्याचे प्रमाण घटते. कोळपणीने वरच्या मुळ्या तुटतात. खालच्या मुळ्यांना जोर येऊन त्या खाली असलेल्या ओलीकडे जातात.

सेंद्रिय खतांचा वापर

सेंद्रिय खतांच्या वापराने मुख्यत: जमिनीची घडण सुधारण्यास मदत होते. जमिनीची घडण चांगली असेल तर त्यात पाणी भरपूर जिरते, पिकांच्या वाढीसाठी फायदा होतो. खोल जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होतो.

सेंद्रिय खतामुळे अन्नद्रव्ये काही प्रमाणात पिकांच्या वाढीस उपलब्ध होतात.

शास्त्रोक्त पद्धतीने कंपोस्ट खत तयार करणे, गांडूळ खत तयार करावे. याशिवाय हिरवळीच्या खतांचा उपयोग वाढविल्यास सेंद्रिय खतांचा जमिनीत साठा होतो.

सर्वसाधारणपणे कोरडवाहू जमिनीत कमीत कमी तीन वर्षांतून एकदा शेणखत मिसळावे. जमिनीत पाणी मुरण्याची आणि ओल टिकवून धरण्याची क्षमता वाढते.

डॉ. पपिता गौरखेडे,

८००७७४५६६६

(अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com