
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने गरजेला कर्जरूपाने अर्थसहाय करूनही २३ हजार १९९ शेतकऱ्यांनी अद्याप कर्जाची वेळेत परतफेड केलेली नाही. त्यांच्यासाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरु केली असून ३० सप्टेंबरपर्यंत योजनेची मुदत आहे.
तरीपण, अजूनही २२ हजार ६८१ जणांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे आता बॅंकेतील प्रत्येक शिपाई, लिपिक, शाखाधिकाऱ्यांना ५० लाखांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून रब्बी व खरीप हंगामात जवळपास ९० हजार शेतकऱ्यांना एक हजार कोटींच्या पीक कर्जाचे वाटप केले जाते. यंदा ८० टक्क्यांपर्यंत बॅंकेने कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २०० हून अधिक शाखा असलेली एकमेव जिल्हा बॅंक आहे. परंतु, ३० जूनअखेर शेतकऱ्यांकडे बॅंकेची अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे तब्बल ७४५ कोटी ७१ लाखांची थकबाकी आहे. त्याची वसुली सुरु असतानाच आता जुन्या थकबाकीदारांमुळे बॅंकेची डोकेदुखी वाढली आहे.
बॅंकेवर प्रशासकराज येऊन आता दोन वर्षाचा कालावधी संपला, पण थकबाकीची अपेक्षित वसुली झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता बॅंकेतील शिपायापासून शाखा अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला त्यांच्या गावातील, परिसरातील पाच थकबाकीदारांकडील कर्जाच्या वसुलीचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले आहे.
तरीदेखील आतापर्यंत ‘ओटीएस’मधून २३ हजार १९९ पैकी ५१८ शेतकऱ्यांनीच कर्जाची थकबाकी भरली आहे. उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत थकबाकी भरण्याचे आवाहन बॅंकेने केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.