
Shirdi Shasan Aplya Dari : ‘‘साईबाबांनी सामान्य लोकांची सेवा करण्याचे बळ दिले. हा राजकीय मेळावा नाही. शासन अनेक निर्णय सतत घेते. अनेक योजना जाहीर करते. ‘शासन आपल्या दारी’ योजनेतून आम्ही सामान्य जनतेसाठी थेट दारात जाऊन काम करत आहोत. पूर्वी योजनांच्या लाभासाठी सातत्याने चकरा माराव्या लागत होत्या.
आता आमच्या सरकारने ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ही संकल्पना मोडीत काढली आहे. पाऊस नाही, शेतकरी चिंतेत, पण सरकार तुमचे आहे. संकट आलेच तर पाठीशी सरकार उभे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील काकडी (शिर्डी, ता. राहाता) येथे गुरुवारी (ता. १७) शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, माजी मंत्री राम शिंदे, बबनराव पाचपुते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवजी कर्डिले, अण्णासाहेब मस्के, खासदार सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, अशुतोष काळे, किरण लहामटे, सत्यजित तांबे, माजी आमदार वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘शासन आपल्या दारी पुणे जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात २२ लाख लाभार्थी नोंदविले गेले. ३ हजार कोटींचा लाभ दिला. नगर जिल्ह्यात २४ लाख ४८ हजार लाभार्थ्यांची नोंदणी होऊन ३ हजार ९८२ कोटींचा लाभ दिला. श्री. फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य एक नंबर होते.
मागील अडीच वर्षांत राज्य पुन्हा मागे गेले आणि आता पुन्हा आमचे सरकार आल्यामुळे राज्य एक नंबरवर आले आहे. केंद्र सरकारच्या पाठबळामुळे विकास साधता आला.’’
या वेळी फडणवीस, अजित पवार, विखे यांची भाषणे झाली. डॉ. अमोल शिंदे यांनी योजनेची माहिती दिली दिली. या वेळी अंबिका मल्हार (पारनेर), सुशिला एकनाथ व्यवहारे, जन्नत शब्बीर इनामदार, विकास सुरजलाल बनकर, सुधाकर घरफोडे, वैभव कांबळे, शारदा राजेंद्र गाडेकर, जया भास्कर पालवे, प्रफुल्ल भाऊसाहेब साळवे, बाळासाहेब गव्हाणे, भारती दीपक वाडेकर, मुक्ता अर्जुन धोत्रे, लक्ष्मण केदार, सुभाष साबळे, दाणित समील तांबोळी, मोहिनी पाचपुते, शकुतला आहिरे, सुमन मिसाळ, सुरेश शिंदे, पंकज दरेकर, रोहित गायकवाड, विशाल रोहमारे, किरण तावले, ममता महाले, स्वप्नील मुंडे, अमोल लोंढे यांचा विविध योजनांचा लाभ देऊन सत्कार केला. तसेच शांताबाई लोंढे कोपरगावकर यांना पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात आली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की माझे मुख्यमंत्री पद जावे यासाठी विरोधक रोज स्वप्न पाहतात, प्रार्थना करतात. उठता- बसता आम्हीच त्यांना दिसतो. कितीही पाण्यात बघा. पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तीन इंजिनचे सरकार वेगाने पुढे जात आहे.
राजकारण कुठल्या स्तरावर जाऊन करता. काही झालं तरी आमचे सरकार शाबूत आहे. दरम्यान, दोन्ही उपमुख्यमंत्री दोन बाजूंना असून शिंदे यांच्या खुर्चीचे रक्षण करत असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी सरकाकडून घेत असलेल्या शासन आपल्या दारी योजनांसाठी काकडी (ता. राहाता) येथे आज (गुरुवारी) कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला लाभार्थ्यांना व लोकांना नेण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
त्यासाठी जास्तीत जास्त एसटी गाड्या आरक्षित केल्या होत्या. त्याचा मात्र ग्रामीण भागातील प्रवासी, शाळकरी मुले, मुली, महिलांना मात्र मोठा त्रास सोसावा लागला. अनेक भागांत आज एसटी गाड्या उपलब्ध नसल्याने फेऱ्या रद्द होत्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.