Amravati News : शासन आपल्या दारी हा इव्हेंट साजरा करीत सरकार शेतकऱ्यांसह जनतेची फसवणूक करीत आहे. इव्हेंटवर खर्चाला सरकारकडे कोट्यवधी रुपये आहेत. मात्र शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, हे केवळ दुर्लक्षच नाही तर फसवणूक आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी (ता. ५) येथे मोर्चाला संबोधित करताना केला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने काढलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री आमदार अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, माजी आमदार गुलाबराव गावंडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, शहराध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, पदाधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, की या भागात दुष्काळ, अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकरी पोळून निघाला असताना त्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे कापूस सोयाबीनसह संत्रा व केळीचे भाव पडले आहेत.
शेतकरी अडचणीत असताना विदर्भासाठी असलेले अधिवेशन फक्त बारा दिवसांचे ठेवले. त्यातही कामकाजाचे दिवस पाचच आहेत. सरकारला विदर्भातील प्रश्नांपेक्षा मुंबईला २५ डिसेंबरला ट्रान्स हार्बरच्या उद्घाटनाची काळजी अधिक आहे.
पीकविम्याच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले, ते म्हणाले एक रुपयात विमा देण्यामागे खासगी विमा कंपन्यांना लाभ पोहोचविण्याची खेळी आहे. या कंपन्यांना हजार कोटींचा प्रीमियम दिला गेला, शेतकऱ्यांनी ओरडू नये यासाठी एक रुपयाची खेळी केली गेली. कृषिविषयक नवीन कायद्यावरही त्यांनी भाष्य केले.
माजी मंत्री आमदार अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, गुलाबराव गावंडे यांचेही या वेळी समयोचित भाषण झाले. सर्वांनी सरकारविरुद्ध संघटित होऊन लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.