Sharad Pawar : '...अन्यथा महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल!'; शरद पवार यांचा सरकारला इशारा

Sharad Pawar On Drought : राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकरी दुष्काळामुळे होरपळत आहे. मात्र राज्य सरकार अंग झटकत असून कोणताही ठोस निर्णय घेत नाही. यावरून थेट शरद पवार यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Pune News : राज्यातील दुष्काळी स्थितीवरून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आक्रमक झाली आहे. दुष्काळी स्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांच्या आधी सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर आता दुष्काळासंदर्भात शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. याबाबत पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहत दुष्काळाबाबत तोडगा काढा अन्यथा महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असे म्हटले आहे.

राज्यात दुष्काळ पडला असताना राज्य सरकार कोणतीच भूमिका घेत नाही. तर राज्याचे कृषीमंत्री परदेश वारीवर जातात यावरून शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच्याआधी पत्रकार परिषद घेऊन तसेच सातत्याने पाठपुरावा करूनही दुष्काळ निवारणाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा, पाणीसाठ्यावर व्यक्त केली चिंता

राज्यात दुष्काळाचे चटके सर्वसामान्यांना बसत असून जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाणी नसल्याने सर्वसामान्यांसह बळीराजा त्रस्त झाला आहे. जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकारने कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही असे पवार यांनी म्हटलेले आहे.

तसेच राज्यात अशीच स्थिती राहिल्यास आणि राज्य सरकारचने यावर कोणतीच भूमिका न घेतल्यास नक्कीच राज्यातील जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा पवार यांनी सरकारला दिला आहे. राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी देखील पवारांनी केली आहे. याआधी २४ मे रोजी पत्रकार परिषदेत राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती बाबात राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारला आपले सहकार्य असेल असेही म्हटले होते असे पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रातून म्हटले आहे.

यादरम्यान आपण मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा छत्रपती संभाजीनगर येथे घेतला. त्यावेळी अशा महत्वपुर्ण बैठकीला लोकप्रतिनिधी आणि कृषीमंत्री गैरहजर होते. ही गंभीर बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीच असेल. पण सध्याच्या कामावरून राज्य सरकार अंग झटकत असल्याचे दिसत असून हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो असे पवारांनी म्हटले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवार यांचे कांदा प्रश्नावरून मोदींना चोख प्रत्युत्तर, म्हणाले… 'मला प्रश्न करण्यापेक्षा तुम्ही काय केलंत ते...'

पाण्याची तीव्र टंचाई

राज्याच्या विविध भागात मागील दहा दिवसांमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली आहे. उजनी, जायकवाडी सारख्या धरणांनी तळ गाठला असून संपुर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. याच्या झळा उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला बसत आहेत. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये तीव्र पाणी टंचाईला शहरी आणि ग्रामीण जनतेला तोंड द्यावे लागत आहे. तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, साताऱ्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगलीच्या जत, आटपाडीत परिस्थिती चिंताजनक असल्याचे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते

तसेच पवार यांनी आपल्या पत्रात राज्यातील टँकरच्या पाणी वाटवापरून राज्य सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे. पवार म्हणाले, मागील वर्षी राज्यात केवळ ११०० टँकर पाणीपुरवठा करत होते. यंदा मात्र ही संख्या ११ हजारांच्या घरात गेली आहे. टँकर उपलब्ध असूनही पाण्याच्या शोधात जावं लागत आहे. जनावरांना चारा आणि पाणी मिळत नसल्याने ते धोक्यात आले आहे. फळबागांची स्थिती देखील बिकट झाली असून यावर सरकारने काहीच प्रयत्न केलेले नाहीत. सरकारने अशा स्थितीत हवालदिल झालेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत. तळागळापर्यंत दुष्काळ निवारणाच्या योजना नेल्या नाहीत हे हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटतं असेही पवारांनी म्हटले आहे.

अन्यथा संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल

तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून आपण राज्य सरकारला सहकार्यच केले आहे. मात्र आता जनतेचे हाल होताना बघून स्वस्थ राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे आवाहन पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केले आहे. तर दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने आपल्या भूमिकेत योग्य बदल न केल्यास आपल्याला संघर्षाची भुमिका घ्यावी लागेल असा स्पष्ट इशारा पवार यांनी या पत्रातून दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com