Beed News : पैठण येथील जायकवाडी धरणाचे गुरुवारी (ता. २६) १८ दरवाजे ३ फुटांनी उघडले होते. शुक्रवारी पहाटेवरिल धरणातून आवक कमी झाल्याने नाथजलाशयाचे १८ दरवाजे एक फुटाने कमी करून सद्यपरिस्थितीत गोदापात्रात ३७ हजार पेक्षा जास्त क्युसेसने पाण्याच्या विसर्ग होत असल्याने बीडमधील गेवराईतील राक्षसभुवनचे शनी मंदिर पाण्यात आले आहे. नदी काठावरील ३२ गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक परिसरात पाऊस सुरू आहे. नाशिक, नगर भागात पाऊस झाल्याने तेथील धरणातून नाथसागरात पाणी विसर्ग करण्यात आला आहे. पैठणचे नाथ जलाशय हे शंभर टक्के भरल्याने बुधवारी गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान, जायकवाडीच्या धरणाचे दरवाजे १० ते २७ अशा एकूण १८ दरवाज्यातून ३ फूट उघडून गुरुवारी दुपारी ५६ हजार ५९२ क्युसेक जलविसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला.
शुक्रवारी पहाटे पुन्हा वाढ करण्यात आल्याने सध्या गोदावरी नदीमध्ये ७६ हजार क्युसेस पाणी विसर्ग करण्यात येत असताना वरील आवक कमी होताच पुन्हा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सद्यपरिस्थितीत नाथ जलाशयातून ३७ हजार ७२८ क्युसेसने पाणी विसर्ग सुरु आहे.
गेवराई तालुक्यातील भारतातील साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील शनी मंदिरात पाणी आले आहे. दरम्यान गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पाथरवाला बुद्रूक, गुळज, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव, आगर नांदूर, खामगाव, संगम जळगाव, हिंगणगाव, गोंदीसह ३२ गावातील नागरिकांना महसूल प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.