
Highway Development: नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग नियोजित आहे. या महामार्गाची आता खरेच आवश्यकता आहे का? त्यासाठी काही मूलभूत प्रश्न, शंका आहेत, त्यांची उत्तरे सरकारने द्यावीत.
या आधीच नागपूर ते रत्नागिरी महामार्ग पूर्ण होत आला आहे, तो महामार्ग या शक्तिपीठ महामार्गाला समांतर असा आहे, मग शक्तिपीठ महामार्गाची गरज काय?नागपूर ते रत्नागिरी महामार्गावर टोल असणार तसेच शक्तिपीठ म्हणजे नागपूर ते गोवा या मार्गावर सुद्धा टोल असणार; असा दुहेरी टोल आकारून जनतेला भुर्दंड पडणार नाही का?
दोन महामार्गांमुळे अपेक्षित टोल वसुली होईल का, कारण हे पैसे वसूल करण्यासाठी दीर्घ कालावधी लागेल. नवीन महामार्गासाठी तब्बल ८६ हजार ६०० कोटी खर्च अपेक्षित आहे. हा सर्व खर्च टोलरूपाने जनतेवरच पडणार आहे.
या शक्तिपीठ महामार्गासाठी जवळपास साडेसत्तावीस हजार एकर जमीन घेतली जाणार आहे, हा महामार्ग तब्बल बारा जिल्ह्यांतून जाणार आहे, यात बऱ्यापैकी सुपीक जमीन आहे. समृद्धी महामार्ग झाला तेथे अधिकतर जिरायत, हलकी जमीन होती. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील नव्वद टक्के शेतकरी एक हेक्टरपेक्षा कमी जमीनधारक आहेत. एवढा जमिनीचा तुकडा जर गेला, तर त्यांच्याकडे जमीनच राहणार नाही.
मुख्यमंत्री सांगतात, आम्ही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला चौपट देऊ त्यातून शेतकरी नवीन जमीन खरेदी करतील. पण हा मोबदला जरी मिळाला तरी जे भूमिहीन शेतकरी होतील, त्यांना नवीन सुपीक तशीच जमीन जवळपास मिळणार नाही. आता आधीच अल्पभूधारक शेतकरी झाले आहेत, ते जमिनी कोणालाही विकणार नाहीत, हे वास्तव आहे.
हा महामार्ग होताना भुदरगड ते आंबोली व सिंधुदुर्ग येथील वनक्षेत्र बाधित होणार नाही का? सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक गावांना आधीच पुणे- बंगलोर महामार्गामुळे पावसाळ्यात पाणी निघून न गेल्यामुळे महापुराचा धोका आहेच; या नवीन महामार्गामुळे तो अजून वाढणार नाही का?
शक्तिपीठ महामार्गामुळे लोकांना शक्तिपीठे पाहता येतील, असे सरकार म्हणते; पण आधीचा जो मार्ग नागपूर ते रत्नागिरी आहे, त्यामधूनही देवांचे दर्शन होईलच ना! त्यासाठी परत दुसरा महामार्ग कशासाठी? जो महामार्ग आहे तो अधिक सुरक्षित, चांगला करावा.
या सर्व मुद्यांचा विचार केला तर खरेच शक्तिपीठ महामार्गाची गरज आहे का ‘यातून शेतकऱ्यांची सुपीक जमीन तर जाणार आहे, तो भूमिहीन होणार, जो अवाढव्य खर्च होणार आहे, तो टोलरूपी राक्षस परत सामान्य जनतेच्या मानगुटीवर कित्येक वर्षे बसणार? तसेच आता नागपूर ते रत्नागिरी महामार्ग असताना हा महामार्ग कशासाठी यांची उत्तरे सरकारने द्यावीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.