Kolhapur News : सौर ऊर्जेच्या वापराकडे कल वाढू लागला आहे. त्याला सहाय्यभूत ठरतील अशीच धोरणे शासनस्तरावरून आखली जात आहेत. जलजीवन मिशनच्या पाणी योजनांसाठीही सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे.
त्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील ८७ गावांत सौर प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. त्यातून दोन हजार १५ किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे. यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून शिल्लक वीज महावितरणलाही देता येणार आहे.
‘हर घर जल’चा नारा देत केंद्र शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले. ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवतानाच माणसी ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे. गडहिंग्लज तालुक्यातील ८७ गावांत जलजीवन मिशनअंतर्गत पाणी योजना मंजूर झाल्या आहेत.
सध्या त्यांची कामे सुरू आहेत. यापूर्वी गावात राबविलेल्या पाणी योजनांची भरमसाट वीजबिले येत आहेत. त्याची रक्कम भरताना ग्रामपंचायतींना नाकीनऊ येत आहेत. दैनंदिन कारभार चालवितानाही तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. थकबाकीमुळे महावितरणकडून अनेकदा वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्कीही येत आहे.
वीजबिलाच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी जलजीवन मिशनमध्ये सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाचा पर्याय देण्यात आला आहे. पाणी योजनांची जॅकवेल व जलशुद्धीकरण केंद्राजवळ सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत.
प्रत्येक गावातील योजनेच्या क्षमतेनुसार हे सौरऊर्जा प्रकल्प आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील ८७ गावांतील या प्रकल्पांतून दोन हजार १५ किलोवॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे. त्याचा वापर पाणी योजनांसाठी केला जाणार आहे. त्यामुळे वीजबिलाचा कोणताही बोजा ग्रामपंचायतींवर पडणार नाही.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.