Onion Seed Production : उत्तम बियाण्यांसाठी शास्त्रीय कांदा बीजोत्पादन

Onion Farming : महाराष्ट्रामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र कांदा बीजोत्पादनामध्ये कंपन्या फारसा रस घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पातळीवर बीजोत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या बीजोत्पादनामध्ये शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती अवलंबणे गरजेचे असते. त्यामुळे उत्तम प्रतीचे बियाणे निर्मिती शक्य होते.
Onion Farming
Onion FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे

Onion Production : कांद्यामध्ये हंगामानुसार आणि रंगानुसार अनेक जाती आहेत. कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने भीमा डार्क रेड, भीमा रेड, भीमा राज, भीमा सुपर, भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा लाइट रेड, भीमा शुभ्रा, भीमा श्‍वेता आणि भीमा सफेद या कांद्याच्या दहा जाती विकसित केल्या आहेत. बीजोत्पादन करताना उत्तम प्रतीच्या कांद्यांची निवड करणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा शेतकरी चांगले कांदे बाजारात विकतात आणि खराब कांदे बीजोत्पादनासाठी वापरतात. त्यामुळे कांद्याच्या नवीन पिढीमध्ये अनेक वैगुण्ये वाढीला लागतात. चांगला वाण टिकवून ठेवायचा असल्यास आणि त्यामध्ये अधिक सुधारणा करायची झाल्यास उत्तम कांद्याची निवड करावी. आपल्याकडील चांगल्या कंदाची बियाण्यासाठी लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे.

हवामान

कांदा पीक हे बीजोत्पादनाच्या दृष्टीने तापमानास अत्यंत संवेदनशील आहे. पराग सिंचनाच्या काळात तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे वाढले तर मधमाश्यांचा वावर कमी होतो. परिणामी बीजोत्पादन कमी होते. तापमानाव्यतिरिक्त स्वच्छ सूर्यप्रकाशसुद्धा बीजोत्पादनासाठी आवश्यक असतो. ढगाळ हवामान किंवा पाऊस यामुळे रोगांचे प्रमाण वाढते. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान यामुळे फलधारणा चांगली होते.

जमीन

मध्यम ते भारी जमिनीत कांदा बीजोत्पादन चांगले होते. जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. चोपण किंवा क्षारयुक्त जमिनीत उत्पादन चांगले येत नाही. तसेच हलक्या किंवा मुरमाड जमिनीत बीजोत्पादन घेऊ नये. अशा जमिनीत फुलांचे दांडे कमी निघतात आणि बी कमी तयार होते.

मातृकांद्यांची निवड आणि लागवड

कांदा बीजोत्पादनातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे मातृकांद्याची निवड होय. तयार होणाऱ्या बीजाची शुद्धता आणि गुणवत्ता प्रत्येक पिढीतील कांदा निवडीवर अवलंबून असते. त्यामुळे मातृकांद्याची निवड करताना निष्काळजीपणा करू नये.

चपटे किंवा जाड मानेचे कांदे लागवडीकरिता निवडू नये. कांद्याचा रंग आकर्षक आणि एकसारखा असावा. कांदे गोल, मध्यम किंवा मोठ्या आकाराचे असावेत. सर्वसाधारणपणे मध्यम आकाराचे कांदे वापरले तर हेक्टरी २५ ते ३० क्विंटल कांदे बियाणे म्हणून लागतात. कांद्याचे वजन ७० ते ८० ग्रॅमच्या दरम्यान असावे आणि व्यास ४.५ ते ६ सें.मी. इतका असावा. प्रत्येक कांद्याचा वरचा एक तृतीयांश भाग कापून काढावा. शक्यतोवर एका डोळ्याचे कांदे निवडावेत. कांदे निवडण्यापूर्वी ते चांगले सुकलेले असावेत. सालपट निघालेले, काजळी आलेले, कोंब आलेले किंवा सडलेले कांदे बीजोत्पादनासाठी अजिबात वापरू नये.

Onion Farming
Onion Seed : रब्बी कांदा बियाण्याची चढ्या दराने विक्री

प्रक्रिया आणि लागवड

कापून तयार केलेले कांदे कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावेत. त्यानंतर त्यांची लागवड करावी. सरी वरंब्यावर लागवड करताना ४५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीच्या एका बाजूवर ३० सें.मी. अंतरावर बीजोपचार केलेले कांदे लावावेत. कंद मातीमध्ये पूर्ण झाकले जातील अशा पद्धतीने लावावे. ठिबक सिंचनावर लागवड करावयाची झाल्यास ५० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. दोन सरींच्या तळाशी २० सें.मी. अंतरावर कांदे ठेवावेत. एक सर मोकळी सोडावी. कांदे ठेवलेल्या सरीचा माथा सपाट करावा. त्यामुळे सरींच्या तळाशी ठेवलेले कांदे मातीने चांगले झाकून जातात. शिवाय ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरवण्यास सपाट जागा तयार होते. एका जोड ओळीसाठी एक ठिबक सिंचनाची नळी वापरता येते.

खत व्यवस्थापन

चांगल्या बीजोत्पादनासाठी खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे. लागवडीच्या २० दिवस अगोदर २५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत पसरवून नांगरट करावी. याच बरोबर १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश आणि ५० किलो गंधक यांची शिफारस करण्यात आली आहे.

कांदा लागवडीच्या आधी स्फुरद, पालाश आणि गंधक यांच्या पूर्ण आणि नत्राची निम्मी मात्रा द्यावी. खत जमिनीत चांगले मिसळावे. उरलेले ५० किलो नत्र दोन भागांत विभागून द्यावे. पहिला भाग कंद लावल्यानंतर ३० दिवसांनी, तर दुसरा भाग लागवडीनंतर ५० दिवसांनी द्यावा. कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मॅगेनीज, बोरॉन आदी सूक्ष्म द्रव्यांची गरज असते. सूक्ष्म द्रव्यांच्या कमतरतेची ओळख पटल्यानंतरच त्यांची सल्फेटच्या रूपातील १ ग्रॅम भुकटी प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. फवारणी करताना त्यात चिकटद्रव्ये ०.६ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळावे. सूक्ष्म द्रव्यांची फवारणी कांदे लावल्यानंतर ५० ते ७० दिवसांच्या दरम्यान करावी. दांड्यावरील फुले उमलल्यानंतर फवारणी करू नये.

Onion Farming
Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

तण व्यवस्थापन

कांदा बीजोत्पादन पिकात तणांचा बंदोबस्त करणे मोठे जिकिरीचे काम असते. विशेषतः फुलांचे दांडे निघाल्यानंतर खुरपणी करणे अवघड जाते. या काळात खुरपणी करताना मजूर आत घुसले तर फुलांच्या दांड्याची मोडतोड होऊन नुकसान होते. फुल येईपर्यंत एक खुरपणी करता येते. कांदे लावल्यानंतर साधारणपणे ४५ दिवसांनी खुरपणी करावी. तण नाशक वापरणार असल्यास, पेंडीमिथॅलीन ३ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे आणि लगेच पाणी द्यावे. पाणी देण्यास ३-४ तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास तणनाशकाची परिणामकारकता कमी होते. तणनाशकाचा परिणाम साधारणपणे ४५ दिवसांपर्यंत राहतो. त्यानंतर पाण्यासोबत किंवा हवेसोबत वाहून येणारे गवताचे बी रुजू लागते आणि तण परत वाढते. अशावेळी ४५ दिवसांनी दुसऱ्यांदा पेंडीमिथॅलीनची फवारणी केली तर तणाचा उपद्रव बराच कमी करता येतो.

विलगीकरण आणि पूरक पराग सिंचन

कांदा पिकात परपरागीभवन होऊन फलधारणा होते. मधमाश्या मध आणि परागकण गोळा करण्यासाठी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर भ्रमण करत असतात. मधमाश्यांचा वावर जवळपास दीड कि.मी.च्या परिसरात होत असतो. त्यामुळे बीजोत्पादनासाठी दोन जाती दीड कि.मी.च्या आत लावल्या तर परपरागीभवन होऊन जातींची शुद्धता राहत नाही. बियाण्यांमध्ये भेसळ होऊ नये आणि गुणवत्ता टिकून राहावी म्हणून कांदा बीजोत्पादन करतेवेळी कमीत कमी दीड कि.मी. विलगीकरण अंतर राखणे आवश्यक आहे. फुले उमलल्यानंतर नैसर्गिकरीत्या मधमाश्या फुलांवर येऊ लागतात. परंतु अलीकडे जंगलतोड आणि कीटकनाशकांचा वाढत वापर यांमुळे मधमाश्यांच्या मोहोळांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे मधमाश्यांची कमतरता जाणवत असल्यास मधमाश्यांच्या एकरी दोन ते तीन पेट्या शेतात फुले उमलल्यानंतर ठेवाव्यात. शेतात मधमाश्यांची संख्या जास्त असणे आवश्यक आहे. मधमाश्यांची कार्यक्षमता टिकून ठेवायची असेल तर कांद्याची फुले उमलल्यानंतर कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये.

कीड आणि रोगांचे व्यवस्थापन

कांदा बीजोत्पादनाच्या पिकावर फुलकिडे आणि लाल कोळी यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. जांभळा करपा आणि तपकिरी करपा या बुरशीजन्य तसेच आयरिश यलो स्पॉट व्हायरस आणि ऍस्टर येलो ड्वार्फ व्हायरस या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे रोगाच्या तीव्रतेनुसार दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

किडींच्या संरक्षणासाठी कांदा लावतेवेळी थायमेट १० किलो किंवा कार्बोफ्युरान ३५ किलो प्रति हेक्टरी मातीत मिसळावे. यामुळे लागवडीपासून जवळ-जवळ एक महिना कीड नियंत्रण होते. त्यानंतर रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट १ मि.लि., प्रोफेनोफॉस १.५ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे चिकटद्रव्यासोबत मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने कीडनाशक बदलून फवारणी करावी. रोग आणि किडीच्या बंदोबस्ताकरिता बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची एकत्र फवारणी करता येते. या सर्व फवारणी फुले उमलण्यापूर्वी कराव्यात. फुले उमलल्यानंतर फवारणी केल्यास मधमाश्यांच्या वावरावर आणि पर्यायाने परागसिंचन आणि फलधारणेवर परिणाम होतो. हे लक्षात ठेवावे.

साठवण

मळणी केलेल्या बियांत १० ते १२ टक्के आर्द्रता असते. म्हणून बी स्वच्छ केल्यानंतर पुन्हा पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ ते ७ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. असे बियाणे एक ते दीड वर्ष टिकते. कांदा बी जास्त दिवस साठवून ठेवण्यासाठी आर्द्रतारोधक पिशव्यांचा वापर करावा. सर्वसाधारणपणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी वाळवून भरले तर ते जास्त दिवस टिकू शकते.

काढणी आणि सुकवण

कांद्याच्या गोंड्यात सर्व बी एकाच वेळी पक्व होत नाही. बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्यांचा रंग तपकिरी होतो आणि बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. सामान्यतः ३ ते ४ वेळा गोंड्यांची काढणी हाताने करावी लागते. काढणी सकाळी वातावरणात आर्द्रता असताना करावी. गोंड्यावर हलकासा ओलसरपणा असल्याने बी गळून पडण्याची भीती नसते. गोंडे ओढून न काढता खुडून काढावेत. गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावेत. चांगल्या प्रकारे सुकलेल्या गोंड्यातून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणनी करून बी स्वच्छ करावे. हलके, फुटलेले, पोचट बी चाळणीच्या साह्याने किंवा प्रतवारी यंत्राच्या साह्याने वेगळे करून उत्तम प्रतीचे बियाणे एकत्र करावे.

पाणी नियोजन

बीजोत्पादनासाठी कांदे लावल्यानंतर पहिले पाणी हलके द्यावे. पहिल्या पाण्यानंतर लगेच कोंब फुटून निघतात. उघडे पडलेले कांदे मातीने झाकून घ्यावेत आणि दुसरे पाणी द्यावे. कांदा बीजोत्पादन सर्वसाधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत घेत असल्यामुळे दोन पाळ्यांमधील अंतर ८ ते १० दिवस ठेवावे. प्रत्येक पाळीत नेहमी हलके पाणी द्यावे. कांदा पिकाची मुळे १५ ते २० सें.मी. खोल जातात. तेवढाच भाग ओला राहील इतकेच पाणी देणे गरजेचे असते. पाणी जास्त झाले तर कंद सडतात. हलक्या जमिनीत पाणी ६ ते ८ दिवसांच्या अंतराने द्यावे. पाणी कमी पडल्यास बी वजनाने हलके राहते आणि त्याची उगवण क्षमता कमी होते. ठिबक सिंचनावर बीजोत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते. एक मीटर अंतरावर ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरवून नळीच्या दोन्ही बाजूंनी कांदा लागवड करून पाणी देता येते. ठिबक सिंचनामुळे पाण्याची ३० ते ३५ टक्के बचत होते, पाणी देणे सुलभ होते. शिवाय तणांचे प्रमाणसुद्धा कमी राहते.

०२१३५-२२२०२६

(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com