
Shaktipeeth Highway Farmers Oppose : शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यांतून मोठा विरोध होत असून हा महामार्ग रद्दच करा, अशी मागणी होत आहे. मात्र, कोल्हापूर वगळता अन्य जिल्ह्यातील विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाचे आरेखन करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर, सांगलीनंतर आता नांदेडमध्ये शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध होत आहे. याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर नांदेडमधील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत.
सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीपुर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची घोषणा करणारे महायुतीचे सरकार आपल्या ताकदीवर हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारण्याच्या प्रयत्नात आहे. पण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला असून सरकारला आपला हिसका दाखवला आहे.
उमरी गावात आलेल्या मंडळ अधिकारी, तलाठी आणि इतर कर्मचाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग नको ! शेतकऱ्यांवर सरकारचा अन्याय आम्ही कधीच सहन करणार नाही ! असं खडसावून सांगून ‘एकच जिद्द...शक्तीपीठ रद्द’ अशा घोषणा दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी पहाता सरकारने शक्तीपीठचा निर्णय त्वरीत रद्द करावा अन्यथा महाराष्ट्र भरातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. अशी प्रतिक्रीया सतेज पाटील यांनी मांडली आहे.
नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शेतकऱ्यांनी बैठक घेऊन शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला. प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचा निषेध या शेतकऱ्यांनी केला आहे. जमिनीपासून ३० ते ४० फूट उंच हा मार्ग होणार आहे. महामार्ग होत असताना जमिनीची नासधूस होऊन जमिनीचा कस कमी होण्याची शक्यता असल्यामुळे, व बागायतदार शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा या प्रकल्पात जात असल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचेही शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली.
खासदार अशोक चव्हाण यांचाही शक्तिपीठला विरोध
"शेतकऱ्यांच्या कुठल्याही हिताचा शक्तिपीठ महामार्ग नसल्याने या महामार्गाला विरोध होत आहेत. नांदेडमधून देखील हा महामार्ग जात असून या महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकरी विरोध करीत आहेत. शक्तीपीठ महामार्गाला पूर्वीही विरोध होता आणि आता ही माझा विरोध आहे. मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का? हे पाहावे लागणार आहे". अशी माहिती भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली होती.
'या' जिल्ह्यातून जाणार महामार्ग
वर्धा ते गोवा असा हा महामार्ग असून या महामार्गामध्ये १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. शक्तीपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.