
Pune News: शेतकऱ्यांचे प्रश्न आणि हक्क मिळविण्यासाठी आपल्या कष्टाचे दाम मिळविण्यासाठी सकारात्मक मार्ग स्वीकारून शेतकऱ्यांना एकत्र केले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. १० शेतकऱ्यांपासून सुरुवात करून आज २६ हजार शेतकरी या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद आहेत.
ही सर्व सभासद शेतकरी मालक असलेली पूर्ण सहकारी तत्त्वावरील कॉर्पोरेट कंपनी आहे. द्राक्षे, टोमॅटो, भाजीपाला उत्पादनासाठी सभासदांना सर्व प्रकारचे साहाय्य, ताजा कृषी माल विक्री व्यवस्था, काढणीपश्चात प्रक्रिया यात काम करण्यात येत आहे. भारतीय शेतकरी जगामध्ये आपला झेंडा रोवू शकतो, असा आत्मविश्वास विलास शिंदे यांनी व्यक्त केली.
‘विश्व मराठी संमेलन - २०२५’ अंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंच येथे आयोजित मराठी उद्योजकांच्या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात ‘बीव्हीजी ग्रुप’चे प्रमुख हणमंतराव गायकवाड, नाशिक येथील ‘सह्याद्री फार्म्स’चे विलास शिंदे, ‘गर्जे मराठी ग्लोबल’चे आनंद गानू देखील सहभागी झाले होते. चर्चासत्राचे निवेदन जयू भाटकर यांनी केले.
शिंदे म्हणाले, ‘‘सह्याद्री फार्म्सचे यश द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. कंपनीने पुढील काळात पूर्ण राज्यभरात पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यानुसार काम सुरू आहे.’’ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, की जगामध्ये हवामान बदलाची समस्या मोठी असून त्यावर मात करण्यासाठी हायड्रोजन फ्यूएल सेल व इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरी उत्पादनात भारतामध्ये सर्वात जास्त काम महाराष्ट्रात करण्यात येत आहे.
त्यामुळे हरित ऊर्जेच्या तंत्रज्ञानात आपण जगात नेतृत्व करू शकतो. देशाच्या १५ टक्के औद्योगिक उत्पादन महाराष्ट्रात होते. तथापि, औद्योगिक उत्पादन क्षेत्रात संशोधनासाठी खूप कमी गुंतवणूक होत असते. त्यामुळे नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात खासगी क्षेत्रासाठी करण्यात आलेली २० हजार कोटी रुपयांची तरतूद खूप महत्त्वाची करणार आहे, असेही ते म्हणाले.
हणमंतराव गायकवाड म्हणाले, ‘‘आपली संस्था कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य तसेच आयुर्वेदामध्ये संशोधन करीत आहे. दहा कोटी लोकांच्या आयुष्यात बदल घडवणे, दहा लाख लोकांना काम देणे आणि शंभर देशात आपल्या संस्थेला घेऊन जाणे हे आपले स्वप्न आहे. संपूर्ण जग विस्तारले आहे. ब्रिटिश राणीने ब्रिटिशांना जी प्रेरणा दिली होती की संपूर्ण जगात जाऊन राज्य करा, ती प्रेरणा आपल्या तरुणांनी घ्यायची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेतला पाहिजे.
तसेच आपल्या मनातील कक्षा रुंदावल्या पाहिजेत. भारत सरकारने ‘बीव्हिजी’ बरोबर एक कंपनी स्थापन केली असून आता तीस लाख नोकऱ्या यातून उपलब्ध आहे. फक्त यासाठी घराचे स्वरूप आणि शिक्षण यातील तफावत भरून काढली पाहिजे,’’ असेही ते म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.