
Nashik News: शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग या सरकारला संपवायचा आहे. त्यांच्याकडून सत्तेचा वापर करून पिळवणूक सुरू आहे. आणीबाणी संपल्यावर जनसंघाच्या माध्यमातून त्यांच्या विचारसरणीच्या व्यक्तींचा शासकीय उच्चपदावर शिरकाव झाला व त्याची फळे आपण आजही भोगत आहोत.
भाजपचा पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आपल्या वर्गीय संघटना कमकुवत होत आहेत, त्यांना पूर्ण बळकटी दिली पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांनी केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २५ व्या राज्य अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. २३) डाव्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यासह भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) राज्यसचिव डॉ. अजित नवले, भाकपचे (माले) कॉ. उदय भट, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले, लाल निशाण पक्ष लेनिनवादीचे सरचिटणीस कॉ. भीमराव बनसोड आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की आज महाराष्ट्रात विरोधी पक्ष जिवंत राहील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्यासारख्या कष्टकऱ्यांच्या पक्षावर मोठी जबाबदारी आली आहे, विचार तत्त्व व बांधिलकीने आपण पक्के आहोत. डाव्या विचारसरणीच्या आणि लोकशाही मांडणाऱ्या सर्व पक्षांच्या तरुण पिढीने किमान वर्षातून एकदा एकत्र यावे व विचारांचे आदानप्रदान करावे, अशी सूचना त्यांनी मांडली.
भारताची विमानतळे इराणविरोधातील युद्धासाठी वापरण्याचा डाव आखला जात आहे. जनसुरक्षा विधेयकाचा मोठा धोका आहे. हिंदीची सक्ती करून सांस्कृतिक दहशतवाद आणला जात आहे. ही आव्हाने पेलण्यासाठी डावी व मानवतावादी आघाडी मजबूत करूया, असे आवाहन डॉ. नवले यांनी या वेळी केले.
ढमाले म्हणाले, की विधानसभेत किती आहोत हे महत्त्वाचे नसून आपण रस्त्यावर किती माणसे उतरवू शकतो, या गोविंद पानसरे यांच्या वाक्याची आठवण करून देत, डावी आघाडी मजबूत करण्याचे आवाहन केले. शाहू–फुले–आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहूया, डावी आघाडी मजबूत करूया, असे भट म्हणाले.
इराणच्या अणुभट्ट्यावर हल्ला करून तिसऱ्या जागतिक युद्धाकडे जगाला ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत शांततेसाठी जनमत एकत्रित करण्याची जबाबदारी डाव्या आघाडीवर असल्याचे मत बनसोड यांनी व्यक्त केले. या वेळी भालचंद्र कानगो, अमरजित कौर, पद्म पाशा, सुभाष लांडे, डॉ. राम बाहेती, राजू देसले, सुनील मालुसरे उपस्थित होते.
भाकप आमचा मोठा भाऊ
भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा आमचा मोठा भाऊ आहे, असे आम्ही समजतो आणि कायम भाकपशी चर्चा करूनच भूमिका ठरवत असतो. डाव्या आघाडीची एकजूट हेच वर्तमान परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एकमेव उत्तर आहे, असे पाटील यांनी नमूद केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.