
Mumbai News: निवडणुकीआधी आश्वासने दिली होती त्यांची पूर्तता करणे दूरच, शेतकरी आणि महिलांचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. शेतकऱ्यांबद्दल शब्दही उच्चारला जात नाही, अशा शब्दांत विरोधकांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सरकारवर टीका केली. तसेच माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील यांनी शेतीचा विकास दर वाढत असताना सात हजार कोटी रुपयांची कपात केल्याची टीका मंगळवारी (ता. ११) केली.
विरोधी पक्षाचे नेते आपल्यावर टीका करणार, मात्र आपण कुठे निघालो आहोत हे लक्षात घेण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यादृष्टीने त्याकडे पाहावे, असा सल्ला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिला. तसेच एखादी नवी योजना आणली, की अन्य खात्यांमधून निधी वळवला जातो. तुमच्या काळातही असे अनेकदा केले आहे. त्यामुळे त्यात नवे काहीच नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांना भुजबळ यांनी फटकारले. यावर हे उत्तराचे भाषण आहे का, असा सवाल करत भुजबळ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनच्या भास्कर जाधव, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली.
जयंत पाटील म्हणाले, ‘‘अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रचंड महसुली तूट आहे. सध्या ४५ हजार कोटींची तूट असून, ती ६० हजार कोटींवर जाऊ शकते. प्रचंड मोठी तूट करणे हा नवा विक्रम या अर्थसंकल्पात आहे. नवीन रोजगार नाही. नव उद्योजक, महिलांसाठी काहीच नाही. डबल इंजिन सरकार म्हणतो, मात्र निवडणूक संपल्यावर केंद्र सरकारकडून येणारे अनुदानात कपात होते.
२०२३-२४ मध्ये ६५ हजार ४४४ कोटी आणि २०२४-२५ मध्ये ५२ हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. राज्याचा करातील वाटा ६९ हजार कोटींवर ७७ हजार कोटींवर गेला आहे. तरीही ही वागणूक दिली जाते. राज्यातील शेतीचा विकास दर चांगला आहे. मात्र त्यालाच केवळ सात हजार कोटींची तरतूद केली आहे. कृषिमंत्र्यांना चांगले काम करायचे असेल तर चांगले बजेट दिले पाहिजे. त्यातच गुंतवणूक जास्त केली तरच विकास होऊ शकतो.’’
शिवसेनेचे भास्कर जाधव म्हणाले, ‘‘या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत शब्दही उच्चारला नाही. निवडणुकीत जे बोलले ते सरकार म्हणून करण्याची जबाबदारी होती. तरीही अनेक खात्यांचा निधी कमी केला आहे. पशुसंवर्धन विभागाल केवळ ५ कोटी, ही तरतूद पाहता हे प्रगत राज्याचे लक्षण नाही,’’ अशी टीका केली. भाजपच्या सीमा हिरे म्हणाल्या, ‘‘निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्तता करण्याची ही वेळ आहे.’’
शेतकऱ्यांनी मतदान केले नाही का? : आव्हाड
जितेद्र आव्हाड म्हणाले, ‘‘या अर्थसंकल्पामुळे राज्यात सर्वात मोठी फसवणूक शेतकऱ्यांची झाली आहे. एक चकारही शब्द नाही. शेतकऱ्यांनी मतदान केले नाही का? नमो शेतकरी महासन्मानचे तीन हजार रुपये वाढ करणार होते त्याचे काय झाले? राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना शून्य रुपयांची बिले येत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या बिलांवर मागील आकडे येतात. तुम्ही फसवणूक का करता? तो तुमचा पोशिंदा आहे. अख्ख्या अर्थसंकल्पात एक वाक्य शेतकऱ्यांसाठी, महिलांबाबत नाही.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.