
Roha News : वीज वितरण कंपनीच्या विद्युतपुरवठा करणाऱ्या तारा शेतातील भाताच्या मळणीवर पडून संपूर्ण गवत धान्य खाक झाल्याची घटना रविवारी (ता. २०) रोहा तालुक्यातील चिल्हे गावात घडली. कष्टाने पिकवलेल्या भाताला आग लागल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
चिल्हे येथील शेतकरी ज्ञानेश्वर महाडिक यांनी आपल्या शेतात खरीप हंगामातील भात कापणी झाल्यानंतर पुन्हा दोन एकर क्षेत्रात रब्बी हंगामासाठी भात लावणी केली होती. काही दिवसांपूर्वीच हे भात कापून त्यांनी झोडणीसाठी रचून ठेवले होते. सध्या लगीन सराई असल्यामुळे त्यांना भात झोडणी करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता.
दरम्यान, ज्या ठिकाणी भात रचून ठेवले होते त्यावरून गेलेल्या विद्युत तारा रविवारी दुपारच्या वेळी तुटून पडल्या. त्यामुळे खाली असलेली संपूर्ण मळणी जळून खाक झाली. आगीत दोनशेहून अधिक मोळ्या; तर ४०हून अधिक क्विंटल धान्य या आगीत जळून खाक झाल्याने शेतकरी ज्ञानेश्वर महाडिक हे आर्थिक संकटात सापडले आहेत. जनावरांसाठीचे गवत व धान्यही जळाल्यामुळे आता महाडिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
चार तास वीजपुरवठा खंडित
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराबद्दल ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच कोलाड येथील कनिष्ठ अभियंता सोबनीस यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
तसेच शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विद्युत तारा कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तत्काळ विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत तीन ते चार तास उपाययोजना करून येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.