Retreating Monsoon : मॉन्सूनोत्तरचा दणका

Heavy Rain : राज्यातील काही भागात मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने दाणादाण उडवली आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील काही भागात मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने दाणादाण उडवली आहे. रविवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगरमधील पिसादेवी, वरूड काझी येथे सर्वाधिक १२३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

जोरदार पावसामुळे खरिपातील तूर, कापूस, सोयाबीन अशा पिकांचे नुकसान झाले असून मराठवाड्यातील इसापूर, सिद्धेश्वर धरण, निम्न दुधना, येलदरी धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात तुरळक सरी :

गेल्या आठवड्यात देशातून परतीचा पाऊस गेल्यानंतर मॉन्सूनोत्तर पाऊस पडत आहे. सकाळी काही अंशी ढगाळ वातावरण असले तरी दहा वाजेनंतर ऊन पडत असले तरी दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अचानक ढग भरून येत असून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे.

त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. शनिवारी दुपारनंतर अचानक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कोकणात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, अंगाव, डिघशी, शहापूर, किनहवळी, डोळखांब, पालघरमधील मोखडा अशा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून भात पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

Heavy Rain
Maharashtra Heavy Rain : वादळी पावसाचा तडाखा सुरूच

मराठवाड्यात पावसाचा दणका :

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील ४० मंडलांत अतिवृष्टी झाली. यामध्ये खुलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अतिवृष्टी झाली. केदारखेडा जवखेडा ठोंबरी येथील शेतकऱ्यांच्या कपाशीच्या शेतात दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळेला जोरदार पावसाने पाणी तुंबले. नांदेडमधील १० मंडलांत अतिवृष्टी झाली.

परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ८२ महसूल मंडलांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील मोरेगाव मंडलात ९४.५ मिमी आणि चुडावा मंडलामध्ये ६६ मिमी आणि हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव ७२.८ मिमी आणि गोरेगाव ७२.८ मिमी मंडलात मिळून दोन जिल्ह्यातील ४ मंडलांत अतिवृष्टी झाली.

काढणी सुरू असलेले सोयाबीन तसेच वेचणीस आलेल्या कापूस तसेच तूर पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु खोळंबलेल्या रब्बी पेरणीसाठी दिलासा मिळाला. सोयाबीनची सुगी अंतिम टप्प्यात आहे. शेतामध्ये सोयाबीनच्या गंजी लावल्या आहेत. अनेक ठिकाणी मळणीयंत्राद्वारे काढणी सुरू आहे. परंतु अनेक पावसामुळे भिजल्याने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. गेल्या ४८ तासांपासून या भागात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

पाणलोटातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात येवा सुरू असल्यामुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील येलदरी व सिद्धेश्वर ही धरण शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे शनिवारी (ता. १९) मध्यरात्रीपासून येलदरी आणि सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला.परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निम्न दूधना धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला.

खानदेश, नगर, नाशिकमध्ये जोरदार

मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ८ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. राहुड येथे अतिवृष्टीने कहर केला असून नदीच्या काठची जमिनी वाहून गेल्या. तर अनेक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर वाहून गेले असून बांधलेली जनावरे खोट्यावरच मृत झाल्याचे भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. येवल्यातील पाटोदा येथील मुसळधार पावसामुळे परिसरात कांदा लागवडीत १२ तासांनंतर पाणी साचले असल्याने लेट खरीप कांदा लागवडी पाण्याखाली होत्या.

Heavy Rain
Rain Update : धुळे, जळगावात पावसाचा फटका

इगतपुरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात पिके भुईसपाट झाली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने कापसासह भाजीपाल्याचे नुकसान सुरूच आहे. फूल शेतीलाही या पावसाचा फटका बसत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रब्बीच्या पेरणीलाही या पावसाळ्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. परतीचा पाऊस गेल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पाऊस पडत आहे.

मागील पंधरा दिवसांत अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसासह भाजीपाला, फूल शेतीला फटका बसत आहे. अहिल्यानगर, पाथर्डी, श्रीरामपूर, नेवासा, राहता, राहुरी, कोपरगाव, अकोले, संगमनेर तालुक्यांतील अनेक भागांत बऱ्यापैकी पाऊस झाला. खानदेशातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार

विदर्भातील बुलडाणा, वाशीम, वर्धा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत पावसाने चांगलाच दणका दिला आहे. यामुळे शेतात पाणीच पाणी झाले असून अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहू लागले आहे. अनेक ठिकाणी कापूस, तूर, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे कपाशीची बोंडे भिजली आहेत.

अनेक भागात कापूस वेचणी सुरू आहे. परंतु मजूर मिळत नसल्यामुळे वेचणी न झालेला कापूस पावसात भिजला. बोंडातून गळून पडल्याने तसेच तूर पीक वाकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे जमिनीत पेरणीसाठी पुरेसा ओलावा नसल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पेरण्या खोळंबल्या आहेत.

या पावसामुळे उपलब्ध झालेल्या ओलाव्यावर पेरणी करता येणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत सततच्या पावसाने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे केले आहे. पळशी बुद्रुक, करंजी, आसेगाव-२ या मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

पावसामुळे नुकसान दृष्टिक्षेपात...

- सोयगावची सोना नदी पहाटेपर्यंत दुथडी भरून वाहतेय.

- जोरदार पावसामुळे वेचणीस आलेल्या कापसाचे नुकसान.

- विदर्भातील अमरावतीतील दोन व्यक्ती ठार, तर पाच महिला मजूर जखमी.

- खानदेश, नगर, नाशिकमध्ये पावसाच्या जोरदार सरी.

- मराठवाड्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग.

येथे झाला सर्वाधिक पाऊस, मिलिमीटरमध्ये :

मंडल --- पडलेला पाऊस

पिसादेवी, वरूड काझी -- १२३

वाथोडा -- १२२,

राणी उंचेगाव --- १२०,

पांगरी --- १०५

चांदवड --- १००,

वरखेड --- ११६,

तळेगाव --- १०५,

रविवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - कृषी विभाग)

कोकण : मुरबाड ४७, अंगाव, डिघशी ४८, शहापूर, किनहवळी, डोळखांब ५४, मोखडा ४९,

मध्य महाराष्ट्र : गिरणारे ५६, माडसांगवी ७२, मखमलाबाद ५२, कोहोर, करंजाळी ६२, चांदोरी ५५, देवगाव ६८, चांदोरी ५५, देवगाव ६८, सायखेडा ५२, नांदूर, विंचूर ६८, देवपूर ७२, वडांगळी ७४, शिरपूर ४३, होळनांथे ५०, थाळनेर ४३, आष्टे ४५, बोरद ६४, पिंप्राळा ६३, लासूर, हातेड ५०, राहाता ५८, लोणी ५४, बाभळेश्‍वर ५८.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर ६१, उस्मानपुरा ७८, भवसिंगपूरा ५९, चिखलठाण ६७, हर्सूल ७९, चोवका ६३, शेकटा ६९, डोणगाव ६२, आसेगाव ६३, गाराज ७५, लासूरगाव ६१, देवगाव, चिंचोली, करंजखेड ८४, वेरूळ ८९, सुलतानपूर ७०, बोरगाव ७४, बनोटी ६९, विरेगाव ८१, रामनगर, पांचवडगाव ७६, परतूर ९३, वाटूर ७४, रांजणी ८७, हडोळती ७८, नांदेड शहर ९५, नांदेड ग्रामीण, माहूर ७०, लिंबगाव ९१, तरोडा ७७, कुरूळा ७६, माळाकोळी ७१, गोळेगाव ७४, मोरेगाव ९४, सेनगाव, गोरेगाव ७२.

विदर्भ : पळशी ७५, नागठाणा ५९, मालेगाव ६३, करंजी ७२, जऊळका ५९, आसेगाव ७५, तिवसा ६८, मोझारी ७६, घारफळ ७३, गुंज ६०, हिवरा ५९, पांढरकवडा, चालबराडी, केळापूर ७२, करंजी ५९, आर्वी ८०, सारवडी ८३, तळेगाव ९७, गिरोली ६०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com