
Mumbai News: राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी आणि अवसायनात असलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची पुनर्रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.
पुनर्रचनेमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. मात्र पवार यांच्यावर कारखाने विक्री आणि भाडेतत्त्वावर देण्यावरून गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यावरून राज्यात राजकारणही रंगले होते.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या किंवा अवसायनात आलेल्या सहकारी साखर कारखान्यांसह त्यांची अन्य युनिट भाडेतत्त्वावर किंवा सहयोगी तत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी २०२० मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.
या समितीच्या बैठकीत साखर कारखाने चालविण्यास देण्याबाबत निकष निश्चित करण्यात आले होते. राज्यातील सत्तांतरानंतर ही समिती अस्तित्वात नव्हती. तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याऐवजी अजित पवार यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर सत्तांतरानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार विभागाची धुरा देण्यात आली होती.
मात्र या काळामध्ये ही समिती अस्तित्वात नव्हती. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असून, आजारी व अवसायनात असलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्वावर देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून यामध्ये सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव हे सदस्य म्हणून तर साखर आयुक्तांचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.