Baramati News : भरडधान्य हे अन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. खाद्यपदार्थ म्हणून त्या धान्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी बारामतीमधील राष्ट्रीय परिषद ही एक महत्त्वाचे पाऊल आहे.
त्यासाठी भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था (माळेगाव-बारामती) संचालक डॉ. के. सामी रेड्डी यांनी केले. या वेळी संशोधकांनी पुन्हा अवतरावे भरडधान्याचे युग असा आवाज देत रेड्डी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
शारदानगर (ता. बारामती) येथे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या वतीने अन्न व कृषिविज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डी बोलत होते.
ॲग्रोझी ऑरगेनाइज प्रा.लि. कंपनी (पुणे) सीईओ डॉ. महेश लोंढे, फूड ॲण्ड टेक्नॉलोजी सेंटर फॉर हेल्थ अॅण्ड अप्लाएड सायन्स गणपत युनिव्हर्सिटी-नॉर्थ गुजरातचे विभाग प्रमुख डॉ. रवींद्र अग्रवाल, कन्सलटेंट डाएटिशियन अॅण्ड न्यूट्रिशिएनिस्ट इंदूर-मध्य प्रदेश संस्थेच्या डॉ. प्रीती शुक्ला, डॉ. अविनाश सावजी, डाएटीशन शहनाज शेख, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, सीईओ नीलेश नलावडे, गार्गी दत्ता, प्राचार्य श्रीकुमार महामुनी, एम. आर. निंबाळकर, डॉ. परिमिता जाधव, डॉ. आर. जे. मराठे आदी उपस्थित होते. या वेळी संशोधक, उद्योजक, कृषितज्ज्ञ, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापक यांनी निर्णायक भूमिका मांडली.
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले. या प्रस्तावाला अनेक देशांनी पाठिंबा दिला. यामुळे भरडधान्याच्या योगदानाचे महत्त्व आणि पोषक आरोग्यदायी आहार म्हणून त्याची उपयुक्तता याबद्दल जनजागृती होत आहे. शारदानगर येथील इनोवेशन अॅन्ड इन्क्युबेशन सेंटरमधील या परिषदेमुळे आरोग्यदायी आहारामध्ये भरडधान्याचे महत्त्व आणि उपयुक्तता मिळणार आहे, असे मत डॉ. के. सामी रेड्डी यांनी व्यक्त केले.
डॉ. अविनाश सावजी म्हणाले, की राळीची खीर, भगरीचे थालीपीठ, उपवासाची भगर, राजगिऱ्याचे दामटे, दाण्याची आमटी हे सर्व मिळविण्यासाठी माझ्यासह अनेकांनी पूर्वी लहानपणी आईबरोबर उपवास केले आहेत. शेतामधील पौष्टिक भरडधान्याची चव आईच्या हातून चाखता आल्याचा आनंद आहे.
परिषद यशस्वितेसाठी होमसायन्सच्या शुभांगी तावरे, प्रा. सत्यम पवार, प्रा. सई देशपांडे, प्रा. मोनिका भोसले, प्रा. शिवानी पाटील, प्रा. जान्हवी उकलगावकर, प्रा. आशिनी गोरे आदींनी परिश्रम घेतले.
शेतकऱ्यांचा होणार फायदा...
ज्वारी, बाजरी हे भरडधान्य कोरडवाहू भागात उत्तम येते. त्यामुळे जेथे शेती फक्त पावसावर अवलंबून आहे तेथे हे पीक उत्तम येते. शिवाय ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. बाजारपेठेत देखील उपलब्ध आहे. ज्वारी, बाजरी सोडून इतर भरडधान्ये ही आदिवासी भागांतच पिकविली जातात. वाढत्या प्रचार-प्रसारामुळे त्यांना बाजारात मागणी वाढली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या या धान्याला भाव मिळत आहे. मिलेट पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना यातून निर्यातीची संधी वाढली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.