Nagar News : देशातील हरितक्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये आपण स्वयंपूर्ण झालो. त्यामुळे अन्नाची शाश्वतता झाली. गहू व तांदुळाचा वापर आपल्या आहारात वाढल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या. आपली पूर्वीची खाद्य संस्कृती बदलल्यामुळे आपल्याला आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. सिंधु संस्कृतीमध्ये बाजरी वापराचा उल्लेख आढळतो.
आद्य संस्कृतीमध्येही हीच खाद्य संस्कृती श्रेष्ठ मानली जात होती. सध्याचा विचार करता चांगल्या आरोग्यासाठी आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढवावा लागणार आहे, असे मत कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त ‘शाश्वत श्रीअन्न शेती’ या परिषदेला शनिवारी (ता. ४) सुरुवात झाली. कृषी सचिव अनुप कुमार, पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील होते. संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता (कृषी) डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, राज्याचे विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक दिलीप झेंडे, आत्माचे संचालक डॉ. दशरथ तांभाळे उपस्थित होते.
राहिबाई पोपेरे म्हणाल्या,‘‘ आपले मुख्य अन्न हे भरडधान्यच असावे, तेच आपण आपल्या शेतात पिकवावे व तेच खावे. मी केलेले काम प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जायला हवे. प्रत्येक गावात राहिबाई तयार व्हावी. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्वारी, बाजरी तसेच नाचणी, बर्टी, वरई यासारख्या पौष्टिक तृणधान्य पिकांचे उन्नत वाण व तंत्रज्ञान आणि रब्बी ज्वारीची पंत्रसूत्री शेतकऱ्यांसाठी विकसित केली आहे.
पारंपरिक शेतीत भरडधान्याचे खुप महत्त्व आहे. भरडधान्य हे कमी कालावधीत येणारे, कमी पाण्याची आवश्यकता असणारे व लागवडीसाठी खर्चिक नसून उच्च पोषणमूल्य असणारी व आपल्या पर्यावरणासाठी महत्त्वाची आहेत. आता आपल्याला अन्न सुरक्षिततेकडून पौष्टिक अन्न सुरक्षिततेकडे जायचे आहे.
श्री. दिलीप झेंडे यांनी पौष्टिक तृणधान्य या विषयावर सादरीकरण केले. या कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्य पुस्तिका व विविध घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी भरड व तृणधान्याच्या कणसांपासून बनविलेला गुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
या वेळी सहा तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्वारी व बाजरी, नाचणी व बरी, वरई व कोडो, राळा व बर्टी, विपणन, प्रसिद्धी व मूल्य साखळी आणि धोरणात्मक बाबी व भविष्यातील दिशा या विषयांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक तांत्रिक सत्रात राज्यातील कृषी विद्यापीठांचे तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्थांचे तृणधान्य पीकविषयक तज्ज्ञ, तसेच कृषी विभागाचे अधिकारी व प्रगतिशील शेतकरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले. तर डॉ. सी. एस. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, कृषी आयुक्तालय, पुणे येथील सहसंचाल रफिक नाईकवाडी, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराडे यांच्यासह सर्व विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, राज्यभरातून आलेले निमंत्रित शेतकरी तसेच महिला शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.