
Akola News : केंद्र सरकारने कांद्यावर लादलेला ४० टक्के निर्यातकराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा वाणिज्य मंत्र्यांच्या निवासस्थानी कांदा फेकणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
याबाबत तुपकर यांनी म्हटले की, हा निर्यात कर लादून आणखी एक शेतकरीविरोधी निर्णय घेतला आहे. ज्या वेळी सोयाबीन-कापसाचे भाव पडले त्या वेळी केंद्र सरकारने भाव वाढविण्यासाठी हस्तक्षेप केला नाही. मात्र, आता टोमॅटो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडत आहे, असे दिसताच अनेकांच्या पोटात दुखायला लागले.
केंद्र सरकारनेही लगेच भाव नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात शुल्क वाढविण्यास सुरुवात केली. विशिष्ट मतदारवर्ग टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने शेतकऱ्यांना मारण्याचे धोरण राबविले जात आहे. कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडणार असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी केला. केंद्र सरकारने तातडीने ४० टक्के निर्यात शुल्काचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी कांदा फेकू, असा इशारा तुपकर यांनी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.