
Latur/Dharashiv News : काही दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने दोन्ही जिल्ह्यांत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाला ब्रेक बसला आहे. या अभियानातून गाळाच्या उपशाने वेग घेतला असतानाचा मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. हा पाऊस अजूनही थांबला नसल्याने अभियानाला गाळा गुंडाळण्याची वेळ आली. यात अभियानाला केवळ दीड महिन्याचाच वेळ मिळाला.
या काळात लातूर जिल्ह्यात बारा लाख ३३ हजार, तर धाराशिव जिल्ह्यात तेरा लाख घनमीटर गाळाचा उपसा करणे शक्य झाले आहे. पावसाने थोडी उघडीप दिली तर धाराशिव जिल्ह्यात अभियानातून हाती घेण्यात आलेल्या नाला सरळीकरण व खोलीकरणाची कामे पूर्ण करता येतील, अशी आशा जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे बंद पडलेले गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान दोन वर्षापासून पुन्हा प्रभावीपणे राबण्यात येत आहे. अभियानात स्वयंसेवी संस्था व लोकसहभागातून विविध ठिकाणच्या प्रकल्प व तलावांतील गाळाचा उपसा करून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात येत आहे. शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासोबत शेतात गाळ पसरून टाकण्यासाठी एकरी काही प्रमाणात अनुदान देण्यात येत आहे. यामुळे अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गाळामुळे जमिनी कसदार होत असल्याने शेतकऱ्यांकडून गाळ उपशासाठी मोठी स्पर्धा आहे. याचा फायदा प्रकल्प व तलावाच्या परिसरातील शेतकरी घेत असतानाही गाळ उपसा करण्यासाठी शेतकरी नेहमीच पुढे येत आहेत. एकीकडे गाळ उपशामुळे तलावातील साठवण क्षमता वाढते तर दुसरीकडे जमिनी कसदार होतात. यातूनच लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी ६८ लाख ५५ हजार घनमीटर गाळाचा उपसा झाला.
सुमारे ३८५ कोटी लिटरने तलाव व प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रदीप काळे यांनी दिली. यंदाही अभियान सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून सुरू होती. यामुळे प्रशासनाने एक एप्रिलपासूनच अभियानाला सुरुवात केली. यंदा १०५ योजनांतून ६९ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. गाळाचा उपसा वेगाने सुरू झाला असतानाच १५ मेपासून पावसाला सुरुवात झाली.
तरीही कमी पाऊस असलेल्या काही तालुक्यांत गाळाचा उपसा सुरू होता. जलसंपदा विभागाकडून नाला खोलीकरण व सरळीकरणाचे कामेही वेगाने सुरू होती. मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अभियानातील कामांना ब्रेक द्यावा लागला. ७६ ठिकाणी कामे प्रगतिपथावर होती. त्यातून १२ लाख ३३ हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला होता. पाऊस थांबल्यानंतर शक्य असेल त्या ठिकाणी गाळाचा उपसा करण्याचे नियोजन असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले.
धाराशिवलाही गाळ उपसा थांबला
धाराशिव जिल्ह्यात यंदा एक कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने त्याची जय्यत तयारीही केली होती. यातूनच मोठ्या प्रमाणात नाला खोलीकरण व रुंदी करण्याचे कामेही हाती घेण्यात आली होती.
यंदा ९७ तलावांतील गाळ उपसा करण्यासोबत २७२ नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामाला गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून मंजुरी देण्यात आली होती.
कामांना वेग येताच पावसाला सुरुवात झाली आणि तो अखंडपणे सुरू राहिला. यामुळे योजनेतील कामे थांबवावी लागली. पावसाने थोडी उघडीप दिली तर शक्य असेल त्या ठिकाणी नाला खोलीकरण व सरळीकरणाची कामे पुढे चालू ठेवण्याचा विचार असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी महामुनी यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.