Pune News : हरियाणा सरकारने नवदीप सिंग, अनिश खतकर आणि गुरकीरत सिंग या शेतकऱ्यांना कैदेत ठेवले आहे. या तिन्ही शेतकऱ्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गुरूवार पासून रेल्वे रोको मोहीम सुरू केली आहे. शनिवारी (ता.२०) तिसऱ्या दिवशी देखील शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून ते मागे हटायला तयार नाहीत. या आंदोलनामुळे आंबाला रेल्वे बोर्डाने १३९ रेल्वे गाड्या रद्द करत २०१ डायव्हर्ट केल्या आहेत. शेतकऱ्यांनी चंदीगडमध्ये रेल्वे रोको आंदोलन केल्यास अत्यावश्यक सेवांसह सर्व रेल्वे गाड्या रद्द केल्या जाऊ शकतात, अशी शक्यता अंबाला रेल्वे बोर्डाने व्यक्त केली आहे.
संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या मार्गदर्शनाखाली शंभू सीमेवर रेल्वे ट्रॅक रोखण्यात आला आहे. येथे तिसऱ्या दिवशीही आंदोलक शेतकऱ्यांची निदर्शने सुरूच आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. तसेच अशीच परिस्थिती राहिल्यास जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे संकट निर्माण होईल, असे वरिष्ठ डीसीएम नवीन यादव यांनी म्हटले आहे. तर रेल्वे ट्रॅक रोखण्यात आल्याने अनेक रेल्वे स्टेशनवर प्रवासी अडकून पडले आहेत.
यावेळी, 'जोपर्यंत नवदीप सिंग, अनिश खतकर आणि गुरकीरत सिंग या शेतकऱ्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार', असल्याचे शेतकरी नेते श्रवणसिंग पंढेर यांनी म्हटले आहे. 'सरकारने कैदेत ठेवलेल्या तिन्ही शेतकऱ्यांना चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप पंढेर यांनी यावेळी केला. 'अनिश खतकर हे आपल्यासह इतर दोन शेकऱ्यांच्या अटकेविरोधात उपोषणावर बसले असून केंद्र आणि हरियाणा सरकरला याचे काही पडलेले नाही. हे सरकार मागे हटायला तयार नाही', अशी टीका पंढेर यांनी केली आहे.
'तिघांनाही चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप पंढेर यांनी करताना, अनिश खतकर हे अटकेच्या निषेधार्थ तुरुंगात आमरण उपोषणाला बसले आहेत. पण केंद्र आणि हरियाणा सरकार मागे हटायला तयार नाही. यामुळे खतकर यांचे काही बरे वाईट झाल्यास त्याला केंद्र आणि हरियाणा सरकार जबाबदार असेल असेही', पंढेर यांनी म्हटले आहे. यादरम्यान पतियाळा रेंजचे डीआयजी आणि एसएसपी यांच्यासोबत शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. मात्र कोणताच तोडगा न निघाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅक रोखला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ डीसीएम नवीन यादव म्हणाले की, या आंदोलनामुळे अंबाला रेल्वे विभागातून आतापर्यंत १३९ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हे आंदोलन दीर्घकाळ असेच सुरू राहिल्यास जम्मू-काश्मीरच्या तेल पुरवठ्यात अडचण निर्माण होऊ शकते. तसेच प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेकडून हेल्प डेस्कही तयार करण्यात आला आहे. तर सध्या रेल्वे चंदीगडहून जम्मू आणि लुधियानाकडे सोडल्या जात आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.